पेन्शन अडीच हजार आणि खात्यात ठेवा तीन हजार!

0

नांदेड। ईपीएफ कर्मचार्‍यांना दर महिन्याला हजार ते अडीच हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. त्यातच काही बँकांनी खात्यात तीन हजार रुपये नेहमीसाठी ठेवण्याचा फतवा काढला आहे. त्यामुळे पेन्शनधारक कर्मचार्‍यांनी उदरनिर्वाह करायचा कसा, असा सवाल सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी बँक प्रशासन आणि शासनाला केला आहे.

नवीन नियम ठरतोय डोकेदुखी
स्टेट बँकेसह अन्य बँकांनी ग्राहकांसाठी काही नियम लागू केले आहेत. मात्र, आता हे नियम ग्राहकांसाठी चांगलेच डोकेदुखीचे ठरत आहे. नव्या नियमानुसार बँकेच्या खातेदार ग्राहकांना तीन ते पाच हजार रुपयापर्यंत रक्कम बँकेत नेहमीसाठी ठेवणे अनिवार्य केले आहे. एवढी रक्कम ग्राहकांच्या खात्यात नसल्यास त्यावर दंड आकारण्यात येईल, असा फतवा बँकांनी काढला आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. घरी पैसे ठेवण्याऐवजी ते बँकेत ठेवल्यास सुरक्षित राहतील. गरजेनुसार ते काढता येतील. हाच एकमेव उद्देश ठेवून ग्राहकांनी बँक खाते उघडून पैसे ठेवले. मात्र, आता बँकेत खाते उघडून त्यात नेहमीसाठी तीन ते पाच हजार रुपये ठेवण्याची काळजी घ्यायची आहे. या नियमाचा सर्वाधिक फटका पेन्शनधारक आणि सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे.

तर उदरनिर्वाह कसा चालवायचा?
दर महिन्याला पेन्शन म्हणून ईपीएफ कर्मचार्‍यांच्या खात्यात एक ते तीन हजार रुपये जमा होतात. त्यावरच या कर्मचार्‍यांचा उदरनिर्वाह आणि औषधोपचाराचा खर्च चालतो. पण, स्टेट बँकेच्या नवीन नियमानुसार आता खात्यात नेहमीसाठी तीन हजार रुपये ठेवायचे आहेत. त्यापेक्षा कमी रक्कम असल्यास दंड आकारण्यात येणार आहे. या नव्या नियमाने ईपीएफ कर्मचार्‍यांची झोप उडाली आहे. पेन्शन स्वरूपात दर महिन्याला त्यांच्या खात्यात अडीच हजार रुपये जमा होतात. त्यामुळे बँकेत तीन हजार रुपये ठेवले, तर आमचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल या कर्मचार्‍यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे बँकेने ईपीएफ कर्मचार्‍यांना यातून वगळण्याची गरज असल्याचे ईपीएफओचे राष्ट्रीय महासचिव प्रकाश पाठक यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.