सांगली । पोलीस कोठडीत हत्या झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. तसेच यापुढे पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलातील वर्दीतील गुंडांची साफकरावी करावी, असे आवाहनही शेट्टी यांनी केले. अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात पोलीस उप-अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे, हा तपास सीबीआयकडे द्यावा, विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी शेट्टी बोलत होते. विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चास प्रारंभ झाला. राजू शेट्टी, माकपचे नेते अजित अभ्यंकर व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी समशेरखान पठाण यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले.
हत्येमुळे पोलीसांमधील आदर संपला
अनिकेतच्या हत्येमुळे पोलिसांचा समाजातील आदरभाव संपला आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे. ते आज सांगलीत जिल्ह्यात असल्याने मोर्चा काढला आहे. मोर्चाद्वारे आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील. अनिकेत कोथळे हत्या प्रकरण केवळ उंटावरच्या पाठीवरची शेवटची काडी आहे. अशी अनेक प्रकरणे घडली आहेत. ती पोलिसांनी दाबून टाकली आहेत. घनवट कामटेसारखे अनेक पोलीस अधिकारी आजही मोठ्या पदावर कार्यरत आहेत. इस्लामपूरच्या कुलकर्णी दाम्पत्याचा हत्येचाही तपासही गुंडाळून. गेली पंधरा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून निवडूण येत आहे. पण कधीही पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला नाही. पण सामान्यांवर न्याय होत असेल तर कधीच गप्प बसत नाही असही शेट्टी यांनी बोलतांना सांगितले.
जिल्हा प्रशासनावर मोर्चा
दर तीन वर्षांनी हे लोकप्रतिनिधी मर्जीतील जिल्हा व पोलीस ठाणे देण्यासाठी अधिकार्यांकडून खंडण्या घेतात. या लोकप्रतिनिधींचाही बंदोबस्त करायला हवा. जोपर्यंत अनिकेतच्या कुटुंबास न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. तसेच पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही. या मोर्चात पृथ्वीराज पवार, गौतम पवार, कॉ. उमेश देशमुख, अफीब बावा, आश्रफ वांकर, नितीन चव्हाण, महेश खराडे, महेश पाटील, आनंद देसाई, आशीष कोरी, सतीश साखळकर आदी सहभागी झाले होते. अनिकेत कोथळेचे संपूर्ण कुटुंबही मोर्चात सहभागी झाले होते. अनिकेतची पत्नी संध्या हिच्या काखेत तिची तीन वर्षाची मुलगी प्रांजल होती. खा. शेट्टी यांनी प्रांजला स्वत:च्या कडेवर घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येईपर्यंत प्रांजल शेट्टी यांच्या कडेवर होती.
अनिकेत कोथळे प्रकरणामुळे गुंडाराज व पोलीस राज यामधील फरक आता मिटला आहे. दोन हजाराच्या चोरीसाठी अनिकेतचा जीव घेतला. त्याचा मृतदेह जाळला. यावरुन पोलिसांमध्ये किती गुंडाराज शिरला आहे, याची प्रचिती येते. पोलीस गुंड व दरोडेखोर झाले आहेत. ‘सुपारी’ घेऊन ते संशयित आरोपींचा खून करीत आहेत. तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे व उपअधीक्षक दीपाली काळे यांना सहआरोपी केल पाहिजे.
– अजित अभ्यंकर, माकपाचे नेते
अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर कामटेने वरिष्ठ पोलीस अधिकार्यांशी संपर्क साधला असण्याची शक्यता आहे. कामटेचे ‘कॉल डिटेल्स’ काढून या अधिकार्यांचा शोध घ्यावा.आपला सीआयडीच्या तपासावर विश्वास नाही. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी.
– समशेरखान पठाण, सेवानिवृत्त पोलीस