नवी दिल्ली: नेहमी वादग्रस्त विधान करत भाजपाला अडचणीत आणणाऱ्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. बुधवारी ठाकूर यांनी लोकसभेत नथुराम गोडसे देशभक्त असल्याचा पुनरुच्चार केला होता. या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी निषेध करीत बुधवारी भाजप सरकारला धारेवर धरल्यानंतर प्रज्ञा यांच्यावर भाजपाने कारवाई केली आहे. वादग्रस्त विधानंतर संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीमधून प्रज्ञा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
भाजपाचे संसदेमधील कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रज्ञा यांचे वक्तव्य दूर्देवी असून संसदेचा कार्यकाळादरम्यान असे वक्तव्य करणे निंदनिय आहे असं मत नोंदवलं. तसेच प्रज्ञा यांना संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सलल्लागार समितीमधूनही काढून टाकण्यात येणार असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केलं. या निर्णयामुळे समितीच्या कोणत्याच बैठकीला प्रज्ञा यांना उपस्थित राहता येणार नाही. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही समिती नेमण्यात आली होती. या समितीत एकूण २१ सदस्य आहेत. विरोधी पक्षातील खासदारांपैकी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.
लोकसभेत सध्या विशेष संरक्षण गट (एसपीजी) सुरक्षेबाबतच्या विधेयकावरील चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान डीएमकेचे खासदार ए. राजा यांनी गांधी हत्येचे उदाहरण दिले. विशेष सुरक्षेअभावी गोडसे याने कशाप्रकारे गांधी हत्या केली हे राजा यांनी सभागृहात सांगितले. परंतु, भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी त्यांना रोखत तुम्ही याप्रकरणी देशभक्तांची उदाहरणे देऊ नये असे बजावले. मात्र, विरोधी पक्षांनी प्रज्ञा ठाकूर यांच्या या वक्तव्यानंतर संताप व्यक्त करीत भाजप सरकारचा निषेध नोंदविला.