प्रतोदांनी दिलेली नावे गटनेत्यालाच ठाऊक नाही

0

मुंबई | दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मांडण्यात आलेल्या गौरवाच्या प्रस्तावावर कोणी बोलावे याबद्दल काँग्रेसचे प्रतोद आणि गटनेत्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचे गुरूवारी विधान परिषदेत दिसून आले. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी आज या प्रस्तावावर बोलण्यास सुरूवात केली. त्यानंतर अनंत गाडगीळ, डॉ. नीलम गोऱ्हे आणि भाई जगताप यांची यावर भाषणे झाली. त्यानंतर उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी वेळेची मर्यादा लक्षात घेता प्रत्येकाने थोडक्यात बोलावे, असे आवाहन केले. त्याला काँग्रेसच्याच नारायण राणे यांनी आक्षेप घेतला. इंदिरा गांधींचे व्यक्तिमत्वच इतके मोठे आहे की, संपूर्ण दिवस त्यावर चर्चा केली तर ती कमी पडेल. त्यामुळे यावर वेळेचे बंधन असू नये, असे ते म्हणाले. त्यावर माणिकरावांनी आपल्याकडे काही नावे आली आहेत, असे सांगितले. रणपिसे यांनी आपणच काही नावे दिल्याचे सांगितले. तेव्हा माणिकराव ठाकरे यांनी प्रतोदांनीही आपल्याकडे काही नावे पाठविली असल्याचे सांगितले. तेव्हा, प्रतोदांनी आपल्याला कोणती नावे पाठवली ते आपल्याला ठाऊक नाही, असे रणपिसे म्हणाले.

त्यातच काँग्रेसचे जनार्दन चांदुरकर यांनी हे काय चालले, असा सवाल केला. कोणी आपले नाव दिले किंवा नाही दिले तरी आपण या प्रस्तावावर बोलणारच, असेही त्यांनी सांगितले. यानंतर उपसभापती ठाकरे यांनी गटनेते व प्रतोदांनी दिलेली यादी वाचली आणि विषयावर पडदा टाकला.