प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावे भाषेचे उत्तमोत्तम अनुभव

0

तज्ञ मार्गदर्शक डॉ. जगदीश पाटील : यावल व रावेर तालुक्यातील 175 शिक्षकांचा सहभाग

फैजपूर- पाठ समजून देण्यासाठी न शिकवता पाठ शिकवण्याच्या निमित्ताने भाषेच्या पक्षहणामकारक वापराच्या संधी दिल्या पाहिजेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला भाषेचे उत्तमोत्तम अनुभव मिळून त्याला विचार करण्याची संधी मिळेल आणि अभिव्यक्त होण्यासाठी मुक्त वातावरण निर्माण होईल, असे प्रतिपादन बालभारती अभ्यास मंडळ सदस्य तथा तज्ञ मार्गदर्शक डॉ. जगदीश पाटील यांनी फैजपूर येथे केले. फैजपूर-सावदा रोडलगत असलेल्या डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजित यावल व रावेर तालुक्यातील इयत्ता पाचवी ते दहावीला शिकवणार्‍या मराठी विषय शिक्षकांच्या जिल्हास्तरीय उद्बोधन वर्गात तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत विषयतज्ञ महेंद्र नाईक उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
उद्बोधन वर्गासाठी रावेर येथील गटशिक्षणाधिकारी विजय पवार, केंद्रप्रमुख हुसैन तडवी, रावेर गटसाधन केंद्रातील विषयतज्ञ जीवनलाल वाडिले, प्रफुल्ल मानकर, यावल गटसाधन केंद्रातील विषयतज्ञ सीमा सातघरे, विजय वरटकर यांची उपस्थिती होती.

अध्ययन निष्पत्तीला अनुसरून अभ्यासक्रमाची पुनर्रचना
डॉ. जगदीश पाटील यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले की, राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार अध्ययन निष्पत्तीला अनुसरून अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. तसेच मूल्यमापनाची प्रक्रिया देखील अध्ययन निष्पत्तीवरच आधारित आहे. त्यामुळे शिक्षकांनी अध्ययन-अध्यापनाची रचना अध्ययन निष्पत्तीला अनुसरूनच करावी. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण, शालेय शिक्षण गुणवत्ता सूचक व शिक्षणाच्या वार्षिक स्थितीचा अहवाल यासंदर्भात आपण कसे मागे पडलो आहे आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा कार्यक्रम पिसा याला कसे सामोरे जायचे आहे यासाठी आवश्यक असलेली उद्बोधनाची गरज सांगितली. तसेच भाषाविषयक अध्ययन निष्पत्तीचे स्वरूप व वैशिष्ट्ये इयत्तानिहाय सांगून भाषेच्या परिणामकारक वापराचे अपेक्षित टप्पे उदाहरणासह पटवून दिले. अध्ययन निष्पत्तीला अनुसरून अध्ययन अध्यापन करताना स्वमत, अभिव्यक्ती, ज्ञानरचनावाद, डिजीटल, कृतियुक्त अध्यापन पद्धती यांचा वापरही शिक्षकांनी कौशल्याने करून घ्यावा, असे आवाहन डॉ. जगदीश पाटील यांनी आपल्या उद्बोधनात केले. विषयतज्ञ महेंद्र नाईक यांनी पहिल्या सत्रात सद्यस्थितीचे विश्लेषण मांडले. डॉ. जगदीश पाटील यांनी दुसर्‍या सत्रात अध्ययन निष्पत्तीला अनुसरून करावयाचे अध्ययन-अध्यापनातील बदल यातील संकल्पना स्पष्ट केल्या. तिसर्‍या सत्रात महेंद्र नाईक यांनी स्तराधिष्ठित अध्ययन अध्यापन पद्धतीचे उदाहरणासह सविस्तर विश्लेषण केले. डॉ. जगदीश पाटील यांनी चौथ्या सत्रात अध्ययन निष्पत्ती व कृतिपत्रिका यांची सांगड घालून मूल्यमापन पद्धतीत झालेला बदल सविस्तर समजावून सांगितला. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पार पडलेल्या या उद्बोधन वर्गात यावल तालुक्यातील 78 तर रावेर तालुक्यातील 97 असे एकूण 175 शिक्षक उपस्थित होते.