जळगाव। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन हे उद्या सोमवारी, ८ मार्च रोजी पदभार स्वीकारणार आहे. कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिला आहे. तो राज्यपाल तथा कुलपतींनी मंजूर केला आहे. प्रभारी कुलगुरू म्हणून प्रा.ई.वायुनंदन यांच्याकडे पदभार सोपविला आहे. प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडून प्रा.वायुनंदन हे सोमवारी सकाळी पदभार स्वीकारतील.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून प्रा.वायुनंदन हे गेल्या चार वर्षांपासून काम पाहत आहेत. तीस वर्षांपासूनचा त्यांना अध्यापन व संशोधनाचा अनुभव आहे. कुलगुरू होण्यापूर्वी ते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात १९८७ पासून कार्यरत होते. आपत्ती व्यवस्थापन विषयात त्यांनी पदविका घेतली आहे. लोकप्रशासन या विषयात त्यांनी पीएच.डी. केलेली आहे. पाच पुस्तके त्यांनी लिहिलेली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थ्यांनी पीएच.डी.चे संशोधन पूर्ण केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. प्रशासन, कामगार प्रशासन आणि सार्वजनिक धोरण हे त्यांचे संशोधनाचे विषय आहेत. आपत्ती व्यवस्थापन बाबतच्या विविध उपक्रमात त्यांनी योगदान दिले आहे.