प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज – उपराष्ट्रपती

0

पुणे येथे कृषी क्षेत्र शाश्वत व फायदेशीर बनविण्यासाठी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन

पुणे :- शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि विमा क्षेत्रांना बळकट करून प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. कृषी उत्पादनाच्या विपणन व्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच शेतकऱ्यांना ज्ञान, तंत्रज्ञान आणि पतपुरवठा केल्यास त्यांची उत्पादकता वाढेल. शेतकऱ्यांच्या ज्ञानात आणि त्यांच्याकडील तंत्रज्ञानात भर घालण्यासाठी सर्वांना शेतकऱ्यांसोबत काम करावे लागेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले.

यांची होती उपस्थिती 

येथील वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेमध्ये आयोजित ‘कृषी क्षेत्र शाश्वत व फायदेशीर’ बनविण्याविषयी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा कृषी तज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन, एस. के. पट्टनायक, आय. व्ही. सुब्बा राव, टी. चटर्जी, आंध्रप्रदेशचे माजी कृषिमंत्री व्ही. राव, अशोक गुलाटी उपस्थित होते.

कृषी क्षेत्रासमोरील आवाहन
उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, शेती व्यवहार्य, फायदेशीर आणि शाश्वत बनविण्यासाठी बहुस्तरीय धोरण विकसित करण्याची गरज आहे. कृषी उत्पादनात आपण मोठी प्रगती केली असून अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झालो आहोत. मात्र यापुढे आपल्याला रासायनिक खते व औषधांच्या वापरावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे.तरच आपण शाश्वत शेतीकडे जाऊ शकतो. शेतीमधून शाश्वत उत्पादन मिळत नसल्याने अनेक जण शेतीपासून तुटत आहेत. विविध उपाययोजनांचा अवलंब करून आपल्याला शेतीला शाश्वत केले पाहिजे. तरुणांना शेती व्यवसायाकडे वळविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कृषी क्षेत्रासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्वांना एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

शेतीला प्रोत्साहन देणे गरजेचे
फळे, भाजीपाला, मसाले, डाळी, आणि ऊस यांसारख्या उच्च मूल्यांच्या पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. उत्पादन वाढीबरोबरच आपल्याला अन्नधान्याच्या कार्यक्षम वितरणाची गरज आहे. शेतकऱ्यांना पीक पद्धती, कापणी नंतरची प्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानाविषयी सल्ला देण्यासाठी कृषि विज्ञान केंद्रांनी अधिक लोकाभिमुखपणे काम करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला शेती क्षेत्र सुधारण्यासाठी काही अर्थपूर्ण आणि व्यावहारिक उपाय शोधून सध्याच्या धोरण व कार्यक्रमांचे सुसूत्रीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

खेडी झाली जलस्वयंपूर्ण
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील ५० ते ५५ टक्के जनता आजही कृषी क्षेत्रावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अवलंबून आहे. मात्र राष्ट्रीय सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा केवळ १० टक्के आहे. यासाठी कृषी क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक होण्याची आवश्यकता आहे. गुंतवणुकीच्या माध्यमातूनच कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास शक्य आहे. त्यासाठी राज्य शासन कृषी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी प्रयत्नशील आहे. कृषी क्षेत्राच्या विकासावर अनेक घटकांचा परिणाम होतो, त्यात मान्सूनचा मोठा वाटा आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे कृषी क्षेत्रावर मोठा ताण येतो. जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून या समस्येवर मात करता येते. महाराष्ट्रात ‘जलयुक्त शिवार’ अभियानाच्या माध्यमातून यावर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘जलयुक्त शिवार’ अभियान हे शास्त्रशुद्ध प्रक्रिया असणारी चळवळ आहे. या माध्यमातून राज्यातील अनेक खेडी जलस्वयंपूर्ण झाली आहेत. शेकडो गावे पाणीदार झाली असून त्या ठिकाणी शेतीसाठी संरक्षित सिंचन उपलब्ध झाले आहे. गेल्यावर्षी सरासरीच्या ८० टक्के पाऊस होऊनही शेती उत्पादन ११० टक्के झाले, हे योग्य प्रकारे जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनामुळेच शक्य झाले.

शासन गट शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील
मुख्यमंत्री म्हणाले, जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांमुळे शेती उत्पादनात वाढ झाल्याने कृषी मालाच्या दराविषयी अडचण निर्माण झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कृषी मालाला योग्य दर देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणावर कृषिमाल खरेदी केला आहे. शाश्वत शेतीसाठी शेती आणि शेतकऱ्यांसमोर मार्केट लिंकेज हे सगळ्यात मोठे संकट आहे. शेतकऱ्याच्या उत्पादित कृषी मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे आवश्यक आहे. त्याच बरोबर छोटी जमीनधारणा ही सुद्धा शाश्वत शेतीसमोरील मोठी समस्या आहे. यासाठी शासन गट शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. गट शेतीला चालना देण्यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना आखण्यात आल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती क्षेत्रात तंत्रज्ञान आणणे आवश्यक असून यासाठी शासन प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असणारी ‘स्वराज्य ते सुराज्य’ ही चर्चासत्राची शृंखला अत्यंत महत्वाची आहे. या माध्यमातून देशातील कृषी क्षेत्रात मोठा बदल घडण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत हा कृषिमाल निर्यातदार देश
यावेळी खासदार शरद पवार म्हणाले, गेल्या काही वर्षात भारत हा कृषिमाल निर्यातदार देश झाला आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी त्यांच्या कौशल्य विकास, व्यापार कौशल्य आणि कृषी क्षेत्रात येणाऱ्या नवनव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याची आवश्यकता आहे. तसेच शेतकऱ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हे चर्चासत्र उपयुक्त आहे.

यावेळी डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी ‘ग्रीन टू एव्हरग्रीन फॉरेव्हर’ या विषयावर सादरीकरण केले. यावेळी त्यांनी आपल्या देशातील शेतीसमोर असणाऱ्या विविध आव्हानांचा आढावा घेतला. शेतीच्या शाश्वत विकासासाठी उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक, शास्त्रज्ञ उपस्थित होते.