धावत्या टॅ्व्ह्ल्सला आग; १४ लाखांच्या नुकसान भरपाई देण्याचे आदेश
जळगाव : धावत असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागून आगीत प्रवाशांचा मृत्यूसह काही जण गंभीर जखमी झाल्याची घटना 2014 मध्ये अमरावतीजवळ घडली होती. यात मयताच्या पत्नीला 13 लाख 42 हजार तर 33 टक्के जळालेल्या महिलेला 4 लाख 24 हजार रुपये देण्याचे आदेश नॅशनल इन्शुरन्स कंपनीला दिले आहे. जळगाव न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या दाव्यात हा निकाल देण्यात आला आहे.
अमरावतीजवळ लागली होती आग
पारोळा येथील भारती गोकुळ हिंदूजा (40), पती गोकुळ हिंदूजा (45) व मुलगा शिवम (5) असे 29 मे 2014 रोजी बाबा ट्रॅव्हल्स बसने पारोळा ते नागपूर प्रवासासाठी निघाले असता अमरावतीजवळ या बसला अचानक आग लागली. त्यात 5 जणांचा मृत्यू तर 14 जण जखमी झाले होते. त्यातील जखमींना नागपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमी झालेल्या गोकुळ सिताराम हिंदूजा यांना मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात आले. तेथे 17 जुलै 2014 रोजी गोकुळ हिंदूजा यांचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी तळेगाव, जि.वर्धा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
नुकसान भरपाईसाठी दावा केला होता दाखल
पत्नी भारती यांनी नुकसान भरपाईसाठी अॅड. महेंद्र सोमा चौधरी (रा.जळगाव) यांच्यामार्फत जळगाव न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरुन मोटार वाहन अपघात प्राधिकरणाचे सदस्य आर.एन.हिवसे यांनी मृताची पत्नी भारती यांना 13 लाख 42 हजार तर स्वत: जखमी झालेल्या भारती हिंदूजा यांना 4 लाख 24 हजार रुपये व मुलगा शिवम याला 40 हजार 500 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश नॅशनल इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत.