14 ते 19 सप्टेंबर दरम्यान होणार भरती
धुळे । कोल्हापुरातील कृषि महाविद्यालयाच्या पटांगणात 14 ते 19 सप्टेंबर या कालावधीत 136 इन्फन्ट्री बटालियन (टी.ए.) महारच्यावतीने पर्यावरणीय दलासाठी राज्यस्तरीय भरती होणार आहे. प्रादेशिक सेनेतील या भरतीसाठी केवळ सैन्यदलातून निवृत्त झालेल्यांनाच अर्ज करता येणार असून संपूर्ण महाराष्ट्र राज्याची भरती कोल्हापुरात होणार आहे. भरती प्रक्रिया झाल्यानंतर 136 टी.एस.बटालियनचा तळ औरंगाबादमध्ये असेल. भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार निवृत्त सैनिक असणे आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. ही भरती 14 आणि 15, 16 आणि 17, 18 आणि 19 सप्टेंबर अशी तीन टप्प्यात होणार असून प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी होणार आहे.
निवृत्तीनंतर पाचवर्ष संधी
सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर 5 वर्षाच्या आतील सर्व जवान आणि जे.सी.ओ यांना अर्ज करता येणार आहे. माजी सुभेदार 48 वर्ष, माजी नायब सुभेदार/हवालदार 45 वर्ष, माजी सैनिक 42 वर्ष वयाच्या 50 वर्षापर्यंत त्यांना सेवा बजावता येणार आहे. सेवानिवृत्तीवेळी कोणत्याही पदावरती असलेल्या उमेदवाराला शिपाई म्हणूनच भरती केले जाईल तर ज्युनिअर कमिशंड ऑफिसर यांना नायब सुभेदार म्हणून भरती केली जाणार आहे.
जिल्हानिहाय भरती
14 आणि 15 या दोन दिवसात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यासाठी 16 व 17 रोजी औरंगाबद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी तर 18 आणि 19 रोजी दिवशी अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात भरती प्रक्रिया होणार आहे.