अमळनेर। येथील अमळनेर शहर पोलीस स्थानकात एका प्रेमीयुगलाचे घरचे मंडळी विवाहास संमती देत नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न करणार्या तरूण तरूणीचे पोलिस ठाण्यातच पोलिसांच्या मध्यस्थीत लग्न लागल्याची घटना नुकतीच घडली. शहरातील बँक कॉलनीत राहणार्या राहुल प्रताप साळुंखे या तरुणाचे व शंकर नगरातील वर्षा रमेश साळुंखे या तरुणीचे मागील दोन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. मुलगा व मुलगी दोघेही आदिवासी पारधी समाजाचे आहे.
लग्नासाठी अखेर दोन्ही कुटुंब तयार
त्यामुळे राहुलने 9 जून रोजी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात तो खाजगी दवाखान्यात उपचार घेऊन शुक्रवारी बरा झाला. तरुणीने देखील अंगावर रॉकेल टाकून घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दोघांनींही पुन्हा असा प्रयत्न करू नये म्हणून या दोन्ही कुटुंबियांचे मन परिवर्तन करण्यासाठी जिल्हा आदिवासी विकास परिषदेचे पन्नालाल मावळे, संजय पवार, अनिल पारधी, गुलाब साळुंखे यांनी पुढाकार घेत दोघे परिवारांचे मतपरिवर्तन केले तर दोघांच्या लग्नाची तडजोड करण्यासाठी पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी देखील समन्वयाची भूमिका पार पाडली. अखेर दोन्ही कुटुंब तयार झाले आणि शुक्रवारी रात्री पोलिस ठाण्यातच हे लग्न विधिवत संपन्न झाले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक देविदास बिर्हाडे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून पोलीस स्थानकाच्या आवारात असणार्या दत्तगुरूंच्या साक्षीने हे लग्न संपन्न झाले आहे.