पुणे । काँग्रेसच्या काळात महिला बचतगटांना चार टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देत महिला आर्थिक सबलीकरणाचे धोरण स्वीकारले होते. पुरुषांसोबतच महिलांनीही व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे यावे, याकरीता काँग्रेसने समानतेचा संदेश देत पुढाकार घेतला होता. महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्यास गावागावातील दारुची बाटली उलटी करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असल्याचे महिलांनीही दाखवून दिले आहे. त्यामुळे महिलांना प्रोत्साहन व योग्य संधी मिळाल्यास समाजपरिवर्तनाची ताकद त्या सिद्ध करू शकतील, असे मत माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
पाटील म्हणाले, सर्वधर्मसमभावाचा विचार घेऊन देश बांधण्याचे काम काँग्रेसने केले आहे. आजच्या काळात निष्ठा, विश्वासर्हता, आदर्श व्यक्तिमत्वांची कमतरता आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे काम आदर्श मानून प्रत्येक महिलेने वाटचाल करायला हवी. पवार म्हणाले, स्त्री ही अबला नसून सबला आहे. अगदी इंदिरा गांधी यांच्यापासून सोनिया गांधी यांच्यापर्यंत देशाच्या राजकारणात सक्रिय असलेल्या प्रत्येक स्त्रीने हे दाखवून दिले आहे. मनामध्ये जिद्द असेल, तर महिला कोणतेही काम करू शकतात.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्व.इंदिरा गांधी जन्मशताब्दी उद्योगिनी सन्मान सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित महिला बचत गट मेळावा व सप्ताहाच्या समारोपप्रसंगी उल्हास पवार, मोहन जोशी, मुकारी अलगुडे, कैलास कदम, नगरसेविका सुजाता शेट्टी, लता राजगुरू, प्रशांत सुरसे, आयुब पठाण, चेतन आगरवाल, उमेश काची, स्वाती शिंदे, कन्हैयालाल साहनी आदी उपस्थित होते. उस्मानाबाद येथील बचत गटाच्या चळवळीतून पुढे आलेल्या महिला उद्योजिका कमल कुंभार यांना मुख्य पुरस्काराने गौरविण्यात आले.
बचत गटांना मार्केटिंगची गरज
जोशी म्हणाले, पुण्यात बचत गटांची मोठी चळवळ सुरू असून त्यातून अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. आजच्या युगात बचत गटांना मार्केटिंगची आणखी गरज असून त्यांना ताकद देण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कमल कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.विकास आबनावे यांनी प्रास्ताविक केले. संगीता तिवारी यांनी सूत्रसंचालन केले. अॅड.रमेश पवळे यांनी आभार मानले.