मुंबई: महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागला असून, अजूनपर्यंत शिवसेना, भाजपा मध्ये सत्तासंघर्ष सुरु आहे. शिवसेना ५०-५० टक्के वाटा हवा आहे, यावर ठाम आहे. फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्याची एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांनी खिल्ली उडवली आहे. ‘हे फिफ्टी-फिफ्टी काय आहे? कुठलं नवं बिस्कीट आहे का?’ असा प्रश्न ओवेसींनी विचारला आहे.
भाजप-शिवसेनेला महाराष्ट्राच्या जनतेशी काही देणंघेणं नाही असा आरोप ओवेसींनी केला आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून शिवसेना-भाजप यांच्यातील संघर्ष टीपेला पोहोचला आहे. मुख्यमंत्रीपदाची माळ अडीच-अडीच वर्षे शिवसेना आणि भाजपच्या गळ्यात पडायला हवी, असा हट्ट शिवसेना धरून बसलीय. दुसरीकडे, असा ५०-५० चा फॉर्म्युला ठरला नव्हता, असं भाजपचं म्हणणं आहे. ओवेसी म्हणाले, ‘भाजप-शिवसेनेला राज्याच्या जनतेशी काही देणंघेणं नाही. साताऱ्यात पावसाने हाहाकार उडवला आहे, पण त्यावर यांनी काही केलं नाही. यांना फक्त फिफ्टी-फिफ्टीची पडली आहे. हा कुठल्या प्रकारचा ‘सबका साथ सबका विकास’ आहे?’
राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडून २४ ऑक्टोबरला निकालही जाहीर झाला. एकाही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. मात्र महायुतीला एकत्रितपणे बहुमत आहे. भाजप १०५ जागा मिळवून सर्वाधिक जागांवर विजयी झालेला पक्ष ठरला आहे. शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. मात्र दोघांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून जुंपली आहे.