गुन्ह्यातील दोन दुचाकींसह चार चाकू मेहुणबारे पोलिसांनी केले जप्त
मेहुणबारे- उंबरखेड येथील महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक अभिजीत मिलिंद काळकर यांच्यावर देवळी-उंबरखेड रस्त्यावर लुटीच्या उद्देशाने पाच जणांनी सशस्त्र हल्ल केल्याची घटना गुरुवार, 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता घडली होती. या प्रकरणी सुरुवातीला तीन आरोपींना अटक करण्यात आली होती तर दोन संशयीत पसार झाल्याने त्यांचा कसून शोध सुरू होता. 5 रोजी आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना 6 रोजी न्यायालयात हजर केले असता ओळख परेडसाठी पोलिस कोठडीचा हक्क राखत न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकींसह चार चाकू मेहुणबारे पोलिसांनी जप्त केले आहेत.
बँकेत जाताना झाला होता हल्ला
मुळचे एरंडोल तालुक्यातील असलेले अभिजीत काळकर हे गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यातील उंबरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत कार्यरत असून गुरुवारी सकाळी 10 वाजता ते आपल्या बँकेचे कॅशियर स्वप्निल प्रकाश देवकर यांच्यासोबत दुचाकीने चाळीसगाव येथून उंबरखेडला निघाले असताना देवळीपासून दोन किलोमीटर अंतरावर उंबरखेड रस्त्यावर पोहचले असता त्यांच्या दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी चाकूनेे हल्ला चढवत बॅग लांबवली होती. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या आठ तासात पोलिसांनी सुरुवातीला समाधान रामदास म्हस्के, वसंत राजु बच्छाव (दोन्ही रा.चाळीसगाव) व साहेबराव उर्फ सायबु विक्रम कोळी (रा.उबंरखेड) यांना अटक अटक केली होती तर खुशाल उर्फ गौरव देवकर व रवी उर्फ भोला पांचाळ (दोन्ही रा.हरीगीरबाबा नगर, चाळीसगाव) हे यांना 5 रोजी अटक करण्यात आली. आरोपींनी पोलिस कोठडीत गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्यांत वापरलेल्या दोन मोटार सायकल, चार चाकू काढले दिले आहेत. आरोपी अट्टल गुन्हेगार असुन त्यांच्यावर चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनला खून, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपास अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.