बंडखोर आमदारांची नाराजी दूर होण्याची शक्यता; कमलनाथ सरकारने घेतला मोठा निर्णय

1

नवी दिल्ली: कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया भाजपवासी झाल्यानंतर मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार अस्थिर झाले आहे. २२ आमदारांनी सामुहिक राजीनामे दिल्याने कोणत्याही क्षणी बहुमत चाचणी घेतली तर सरकार पडण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी कमलनाथ यांच्याकडून प्रयत्न सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून बंडखोर आमदारांची अनेक दिवसांची मागणी मान्य करत राज्यात तीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यास मुख्यमंत्र्या कमलनाथ यांनी मान्यता दिली आहे. नवीन जिल्हा निर्मितीच्या सरकारच्या निर्णयात चाचौडा, नागदा आणि मेहर या शहरांचा समावेश आहे. कमलनाथ सरकारच्या कॅबिनेटने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आमदारांची नाराजी दूर होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे किती आमदार काँग्रेसमध्ये परत येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपचे नाराज असलेले आमदार नारायण त्रिपाठी गेल्या अनेक वर्षांपासून मेहरला (सतना) ला जिल्हा बनविण्यासाठी आग्रही होते. मतदार संघात जे विकासावर बोलतील त्याच्यासोबतच राहु अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या व्यतिरिक्त दिग्विजय सिंह यांचे बंधू लक्ष्मण सिंह हे चौपाडा (गुना) शहराला जिल्हा करण्याची मागणी करत होते. या मुद्दावरून त्यांनी काँग्रेसला अनेकदा घरचा आहेर दिला होता. तर नागदाला (उज्जेन) जिल्हा बनवून मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिलीप सिंह गुर्जर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.