दिल्ली: हैदराबाद बलात्कार प्रकरणाचे चारही आरोपी आज सकाळी झालेल्या एन्काऊंटरमध्ये ठार झाले आहेत. यावर आता सर्वच स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहे. यावर योगगुरू बाबा रामदेव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. बलात्कारी आणि दहशतवाद्यांवर अशाच प्रकारची कारवाई झाली पाहिजे. ज्या घटनांबाबत साशंकता असेल त्याबाबतच न्यायालयात जायला हवे, असं म्हणत त्यांनी या एन्काउन्टरचे समर्थन केले आहे.
अशाप्रकारचे अपराधी हे कलंक असतात. अशा लोकांमुळे संपूर्ण देश आणि धर्म, संस्कृती बदनाम होत असते. जे दुष्कृत्य करतात त्यांच्यासोबत आणि दशतवाद्यांविरोधात त्याच ठिकाणी पोलिसांना, सैन्याला आणि निमलष्करी दलाला अशीच कारवाई करायला हवी, असं परखड मत रामदेव बाबा यांनी व्यक्त केलं. ज्या घटनांबाबत काही साशंकता असेल त्या घटना न्यायालयापर्यंत नेल्या पाहिजेत. त्यावेळीच कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब केला पाहिजे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना तपासासाठी घटनास्थळी नेण्यात आलं होतं. यावेळी आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. चौघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं, अशी माहिती सायबरादाबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिली आहे.