बळजबरीने जमीन संपादित केली जात असल्याचा आरोप

0

मुंबई – राज्य सरकारच्या मुंबई-नागपूर, या प्रस्तावित समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने जमीन घेतली जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे विधान परिषदेचे कामकाज मंगळवारी दोन वेळा तहकूब झाले.

काँग्रेसचे सदस्य संजय दत्त यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचा विरोध असताना सरकार पोलीस बळाचा वापर करून जमीन संपादित करत असल्याचा आरोप केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी त्याला उत्तर दिले. शेतकऱ्यांच्या संमतीनंतर त्यांना पूर्ण नुकसानभरपाई देऊन त्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेत. ३९२ प्रकल्पग्रस्त गावांपैकी आतापर्यंत ३७१ गावांतल्या जमिनी शेतकऱ्यांच्या संमतीने संपादित करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी शहापूर, नाशिक आणि इगतपुरी जिल्ह्यांत किती शेतकऱ्यांनी संमती दिली, असा सवाल केला. त्यावर मंत्रीमहोदयांनी विरोधकांचे समाधान करमारे उत्तर दिले नाही. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी उत्तर राखून ठेवण्याची मागणी केली. त्यावेळी झालेल्या गदारोळानंतर तालीका सभापती आनंद ठाकूर यांनी १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे पुन्हा गदारोळ झाला व तालीका सभापतींनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले व त्यापूर्वी या सूचनेवरील उत्तर राखून ठेवले.