मुंबई – मृत मंजुळाच्या अंगावर असलेल्या खुणा ह्या तिला केलेल्या मारहाणीमुळे नव्हे, तर बाथरूममध्ये पाय घसरून ती पडल्यामुळे झाल्या आहेत, असा अजब तर्क पोलिसांनी कोर्टात केला. या प्रकरणी चक्रावून गेलेल्या कोर्टाने इतर दोषींना वाचविण्यासाठीही तुम्ही असाच प्रयत्न करता त्यांना अशीच साथ देता का? असा खडा सवाल पोलिसांना केला आहे. भायखळा तुरुंगात पोलिसांच्या मारहाणीत मंजुळा शेट्येचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोषी असलेल्या 6 पोलिसांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले, यावेळी पोलिसांनी हा दावा केला.
इतर कैद्यांनाही वाचवण्यासाठी असाच प्रयत्न करता का, न्यायालयाचा सवाल
23 जून रोजी मंजुळा शेट्येला भायखळा तुरुंगात पोलिसांनी जबरदस्त मारहाण केली होती. 2 अंडी आणि 5 पाव यांचा हिशोब कैद्यांची महिला वॉर्डन असलेल्या मंजुळाकडून लागत नव्हता म्हणून सहा पोलिसांनी तिला बेदम मारहाण केली. ज्यानंतर तिला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होेते, मात्र 24 जून 2017 रोजी तिचा मृत्यू झाला होता. तुरुंग अधिकारी मनिष पोखरकर, तुरुंग रक्षक बिंदू नाईकोडी, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या सगळ्यांना मंजुळाच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खटला सुरू आहे.
60 कैद्यांनी आरोपींना ओळखूनही पोलिसांचे *बचावकार्य* सुरूच
या सगळ्या दोषींना न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली होती. आता न्यायालयात कोर्टासमोर पोलिसांनी साक्ष देताना मंजुळाच्या अंगावर झालेल्या जखमा या मारहाणीमुळे नाही तर बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने झाल्या होत्या, असा अजब दावा केला आहे. खरंतर याप्रकरणात 292 महिला कैद्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. ज्यापैकी 60 कैद्यांनी मंजुळा शेट्येला मारहाण करणारे सहा जण कोण पोलीस होते हे बरोबर ओळखले आहे. अशातही पोलीस मात्र मंजुळाच्या अंगावर जखमांच्या खुणा या माराहाणीच्या नाही तर पडल्यामुळे झाल्या असल्याचा दावा करत करत पोलिसांचे बचावकार्य सुरू आहे. आता न्यायालय याबाबत काय निर्णय देते, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मंजुळा शेट्ये या महिला कैद्याचा 24 जून 2017 रोजी मृत्यू झाला. हा मृत्यू तुरूंग अधिकार्यांच्या मारहाणीत झाल्याची माहिती समोर आली. मंजुळा शेट्येच्या मृत्यूपूर्वी तिला नग्न करून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचाही आरोप झाला. एका बॅरेकमध्ये तिला निर्वस्त्र करून मारण्यात आले असा आरोप इंद्राणी मुखर्जीने केला आहे. इंद्राणी मुखर्जी आणि इतर महिला कैद्यांनी मंजुळावर तुरूंग अधिकार्यांनी अमानुष लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.