नवी दिल्ली: जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात देखील कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील चार दिवसांत तब्बल एक लाख नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहे. देशातील रुग्णांच्या संख्येने आठ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
देशातील कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 27 हजार 114 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 519 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने 22,123 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 8,20,916 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने आज दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 2,83,407रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 5,15,386 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.