बाबासाहेबांच्या चळवळीचे वारस कोण?

0

6 डिसेंबर विश्‍वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, त्यांनी 6 डिसेंबर 1956ला वयाच्या 65 व्या वर्षी आपला अखेरचा स्वास घेऊन समस्त भारतवासीयांना पोरकं करून गेले, त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांच्या नावाने मिरवणारे अनुयायी त्यांच्या विचारसरणीचे पालन करून, चळवळीचे वारस होत आहेत का? का बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेली चळवळ मंद पडली? असा प्रश्‍न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना पडणे साहजिकच आहे.

भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीभेदाच्या दाहकतेचे चटके सहन करून जातीनिर्मूलनासाठी लढा दिला. मात्र, अजूनही मनातून जात नाही हे प्रत्ययाला येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, ‘परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी समाजमनात परिवर्तनवादी विचार रुजणे आवश्यक आहे’, हे डॉ. बाबासाहेबांचे मौलिक विचार प्रत्येक कार्यकर्त्यांनी आत्मसात केले पाहिजे. समाज परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या थोतांड गप्पा आजचे राजकीय पुढारी करताना दिसतात. मात्र, परिवर्तन म्हणजे काय? हा प्रश्‍न या पुढार्‍यांना विचारल्यास दोनाचे चार होतात. म्हणजे समाजाला दिशाभूल करून, बाबासाहेब आबेडकरांनी उभारलेली राज्यघटनेच्या बळावर तुम्ही नेते लोक आम्हा सामान्य जनतेस अजूनही गुलामीत ठेवण्याचे षडयंत्र रचता हे पाहून मला वाटते, बाबासाहेब तुमचा अनुयायी आत्ता चळवळीचा वारस राहिला नाही, तुम्ही दिलेल्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा! असा मोलाचा संदेश. मात्र, या संदेशाचे पालन न करता आजही स्वत:ला आंबेडकरी अनुयायी म्हणून मिरवत असतात. त्यामुळे समाजामध्ये राडा करून पुढे काय करणार? असा माझ्यासारख्या अनेक सर्वसाधारण आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये ‘आंबेडकरी चळवळ कुठे निघाली?’ हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

आम्ही शिक्षण घेतले. कुठलेही कुटुंब अशिक्षितच्या दारात राहिले नाहीत. सर्वसामान्य जनतादेखील शिक्षणाचा घोट घेत आहेत. समाजासाठी एकवटत आहेत. मात्र, संघटित होताना एक अहंकार आमच्या मनामनांत भरलेला दिसतोय म्हणून संघटित होतो खरे, पण संघर्षाच्या नावाने बोंबाबोंब आहे, आम्हाला चळवळीचा वारस नाही, तर त्या चळवळीचा पुढारी होण्याचे स्वप्न आम्ही उरावरती बाळगत आहोत, म्हणूनच आज कित्येक समाज अन्याय, अत्याचारांना सामना करतानाचे चित्र दिसत आहेत, आमच्या समाजावर अन्याय होतोय, मग समाजातला एखादा पुढारी समोर होतो आणि एखादी संघटना स्थापित करतो, संघटनेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सदस्य यांसारखी पदभरती होते आणि संघर्षाला सुरुवात केल्यास कालांतराने आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना पदाची लालूच लागते अन् तो दुसरी संघटना स्थापित करून, त्यांच्या पदाचा राजा होतो आणि करतो संघर्ष, केवळ स्वार्थासाठी हा क्रम आज देशातल्या प्रत्येक समाजात चालू आहे. बाबासाहेबांनी संघटित व्हा म्हटलेत, असे स्वतंत्र संघटित व्हा असे नाही, अशाने समाजाचे प्रश्‍न सुटत नसून उलट वाढत चालले आहेत, शिक्षण घेतलेत. आकडेवारीची ओळख व्हावी म्हणून?, संघर्ष करतोय, स्वार्थ निर्माण करून या देशातल्या नागरिकांना लुबाडण्यासाठी, ही कसली मनोवृत्ती. नेता होतो समाजहिताच्या गोष्टी फक्त भाषणापुरतेच, जात धर्म वंश अशा बुरसटलेल्या विचारांनी एखादा नेता जर आम्हाला समाजकार्य शिकवत असतील, तर ते देशाच्या संविधानाचे पाईक नाहीत, बाबासाहेब तुमच्या अनुयायांकडे आज ना तुमच्या विचारांचे घर आहे न तुमच्या अस्तिवाची त्यांना जाणीव. बाबासाहेबांच्या जीवनातील एक प्रसंग, बाबासाहेब शांतपणे एका कोपर्‍यात बसून समाजाच्या पुढील भवितव्याचे चिंतन करत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी पाहून एका अनुयायांनी त्यांना विचारले बाबासाहेब आम्ही काय पाहत आहोत, तुमच्या डोळ्यात पाणी? तेव्हा बाबासाहेब उत्तर देत म्हटले, गड्या मी दूर दूर पाहत आहे माझ्या चळवळीचा वारस मला कोणी दिसत नाही, हे सर्व उभारलेली चळवळ आत्ता माझ्यानंतर नामशेष होणार का? ही भीती वाटत आहे, हे त्यांचे शब्द आहेत, हे नानक चंद रत्तू यांनी हे शब्दबद्ध केलेत, यावरून बाबासाहेबांची दूरदृष्टीची जाणीव होते, बाबासाहेब गेले याचा अर्थ त्यांची चळवळ संपली असे नाही, त्यांनी उभारलेली अस्पृश्यता, जाती भेद, धर्म भेद अशा बुरसटलेल्या विचारावरील चळवळ आज मंद पडली आणि अशा विचारांचा जागर आज या देशात झपाट्याने वाढत चालला आहे, अनेक ठिकाणी जातीय दंगली होताना दिसत आहेत, अनेक ठिकाणी धर्म द्वेष, प्रांत द्वेष या माध्यमातून हा मानव एकमेकांना संपवत निघाला आहे, आजही ती अस्पृश्यता संपली नाही, आजही वर्णव्यवस्था आहे, यावर कुठे तरी आपण चिंतन केले पाहिजे आणि समस्त समाजाने बाबासाहेबांच्या चळवळीचा पाईक होऊन अन्यायावर लढा उभारला पाहिजे, तरच खर्‍या अर्थाने भारतरत्न विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ठरेल. आजच्या आधुनिक काळात विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांचा आदर्श बाळगून अंगीकारावा!

– श्रीपाद नागनाथ राऊतवाड, नांदेड
8007870026