बारामती तालुक्यावर दुष्काळाचे सावट

0

बारामती । सलग चार वर्षांचा दुष्काळ, पाण्याची कमतरता व जनावरांसाठी चार्‍याची कमतरता, ही स्थिती आहे बारामती तालुक्याची. या गंभीर परीस्थितीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे हाल होत आहेत. याही वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने या भागावर सलग पाचव्या वर्षीही दुष्काळाचे ढग घोंगावू लागले आहेत. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. खरीप हंगाम पाण्यावाचून शेवटची घटका मोजत आहे.

या वर्षी काही ठिकाणीच तुरळक पाऊस झाला. मात्र बहुतांश भागात पावसाने पाठ फिरवली. ओढे, नाले कोरडे ठणठणीत पडले आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. पाऊस झाला नसल्यामुळे शेतात केलेला खर्च, बियाणे, मशागतीचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बारामती तालुक्याच्या जिरायती भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी जानाई शिरसाई व पुरदंर उपसा योजना केली. या भागातील लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी पाण्याच्या दुर्भिक्षाविषयी माहीती देऊनही पाणी सोडले नाही. या भागात पावसाळ्यात देखील पाणी पाणी करावे लागत आहे.

जनता आंदोलनाच्या पवित्र्यात
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मोरगावसह परिसरातील आठ, दहा गावांत टँकरद्वारे एक बॅरल पाणी मिळत आहे. पावसाळ्यातच पाणी पाणी करावे लागत असल्याने आता ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तालुक्यातील मोरगाव, आंबी बु., आंबी खुर्द, जोगवडी, तरडोली, लोणी भापकर, लोणी माळवाडी, काजहाटी, बाबुर्डी, जळगाव क. प. आदी गावे जेजुरी येथील नाझरे जलाशयावर अवलंबून आहेत.

टँकरने पाणी पुरवठा
तरडोली येथे तब्बल दहा दिवसांतून टँकरने पाणी पुरवठा होतो. मात्र, तेही केवळ एक बॅरल पाणी मिळते. काहींनी पाणी न मिळत नसल्याने ते तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत. एक बॅरल पाणी आंघोळ, जनावरांना पाणी, कपडे धुणे, प्रातर्विधी व पिण्यासाठी कसे वापरायचे? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. जुलै महिन्यात केवळ 15 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा नाझरे धरणात आहे. मात्र, तरीही प्रशासनामार्फत कुठलीही ठोस उपाययोजना न केल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

शेतकरी चिंतेत
जनावरांचा चारा महागला असून कडब्याच्या एका पेंडीला 30 रुपये दर देण्याची वेळ इंदापूरवासीयांवर आली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. खरिपाची पेरणीच झालेली नसल्यामुळे सोयाबीन, उडीद व मूग तालुक्यातून गायब झाल्याचे चित्र यावर्षी दिसत आहे. जर ऑगस्टअखेरपर्यंत पाऊस न झाल्यास कोरडा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. खरिपाच्या पेरण्या जवळजवळ तीन महिन्यांनी लांबल्याने शेतकरी चिंतातूर झालेला आहे.

दुष्काळ जाहीर करा
जनावरांना हिरवा चारा मिळत नसल्याने दूध उत्पादनात कमालीचा फरक पडलेला आहे. कडब्याचे भाव गगनाला भिडलेले असल्याने एका कडब्याच्या पेंडीला 30 रुपये मोजावे लागत आहेत. जिरायती भागातील काही मोजक्या शेतकर्‍याने मकापिकाची पेरणी केलेली आहे. परंतु मका उन्हाने जळल्याचे दिसते. सोयाबीन, उडीद, मूग ही कडधान्य यावर्षी हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. त्वरित या शेतकर्‍यांना जळालेल्या पिकांची व पेरणी न झालेल्या शेतकर्‍यांच्या जमिनीची पाहणी करण्यात यावी व दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना मदत करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.