बारावीचा ९९.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. इयत्ता दहावीप्रमाणे बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले असून बारावीचा राज्य मंडळाचा निकाल 99 .63 टक्के लागला आहे. त्यात विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के वाणिज्य शाखेचा 99 .91 टक्के तर कला शाखेचा 99.83 लागला.शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 46 तर 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण मिळाले आहे. कोकणचा सर्वाधिक 99.81 टक्के आणि औरंगाबाद 99.34 टक्के सर्वात कमी असा निकाल लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निकालात ८.९७ टक्के वाढ झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे दहावी,अकरावी आणि बारावीतील अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारे बारावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा बारावी परीक्षेसाठी 13 लाख 17 हजार 76 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार केलेला नाही.या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारसाठी एक संधी उपलब्ध राहिल,असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

निकाल पाहण्यासााठी संकेतस्थळ

1) https://hscresult.11thadmission.org.in
2) https://msbshse.co.in
3) hscresult.mkcl.org
4) mahresult.nic.in.

बारावी निकालावर आक्षेप नोंदवता येणार

राज्य मंडळाकडून मंगळवारी जाहीर केल्या जाणा-या इयत्ता बारावी निकालावर विद्यार्थ्यांना आक्षेप किंवा तक्रार नोंदवता येणार असून विभागीय मंडळ स्थरावरून संबंधित तक्रारींचे निराकर केले जाणार आहे,असेही राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.