बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवांचे पीक

0

मुंबई । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाबाबत सध्या सोशल मीडियावर अफवांचे पीक आले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळाचे वातावरण आहे. दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखांबाबत वेगवेगळे मेसेज फिरत आहेत. यामध्ये बारावीचा निकाल 25 मे तर दहावीचा निकाल 30 मे रोजी जाहीर होणार असल्याचे म्हटले आहे. परंतु या निव्वळ अफवा असल्याचे बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

अफवांवर विश्‍वास ठेवू नका!
मागील वर्षी बारावीचा निकाल 25 मे रोजी जाहीर झाला होता. त्यामुळे काहींनी यंदाचा निकालही 25 मे रोजी जाहीर होणार असल्याचा मेसेज व्हायरल केला. परिणामी विद्यार्थीही संभ्रमात पडले आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या निकालाच्या तारखा अधिकृत नाहीत. बोर्डाने निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा मेसेजवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन बोर्डातर्फे करण्यात आले आहे.

बारावीचा निकाल महिना अखेरीला
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या आठवड्यात बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करेल. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच दहावीचा निकालही याचदरम्यान लागेल, असे बोर्डाच्या सुत्रांनी सांगितले आहे.