बाळासाहेबांच्या बाळकडूमुळे शिवसेनेचा आज वटवृक्ष – ना. गुलाबराव पाटील
शिवसेनेच्या वर्धापनदिनी पालकमंत्र्यांनी दिला आठवणींना उजाळा
जळगाव (प्रतिनिधी) : एक नेता, एक झेंडा आणि एक विचार या ध्येयावरून चालण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या बाळकडूमुळे आज शिवसेनेचा वटवृक्ष झाल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील म्हसावद येथे आयोजीत पक्षाचा मेळावा व सदस्य नोंदणी अभियानात ना. पाटील बोलत होते. या कार्यक्रमात त्यांनी साध्या शिवसैनिकापासून ते आज मंत्रीपदापर्यंतच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे उलगडून सांगतांना आठवणींना उजाळा दिला. आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. याचे औचित्य साधून तालुक्यातील म्हसावद येथे आज पक्षाचे मेळावा आणि सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करतांना ना. गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या वाटचालीबाबत सविस्तर विवेचन केले.