बाहुबलीला मारणार्‍या कटप्पाने मागितली माफी

0

बंगळुरु: बाहुबली 2 – द कन्क्लूजन या चित्रपटाबाबत कर्नाटकमध्ये वाढता विरोध पाहून कटप्पा अर्थात अभिनेता सत्यराज यांनी तिथल्या जनतेची अखेर माफी मागितली आहे. सत्यराज यांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करून कर्नाटकच्या लोकांची माफी मागितली आहे. दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या बाहुबली 2 या सिनेमाची प्रेक्षक चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. आता सिनेमा प्रदर्शनासाठी तयार असून वाद मात्र सुरूच आहेत.

सुमारे 9 वर्षांपूर्वी तमिळनाडू आणि कर्नाटकशी संबंधित कावेरी नदी वादात सत्यराज यांनी कन्नडविरोधी विधान केले होते. त्यामुळेच कर्नाटकमध्ये सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत वाद उफाळला आहे. मात्र तामिळ लोकांच्या विकासाबाबत कायमच बोलणार. मग यासाठी इंडस्ट्रीमध्ये मला कोणी काम दिले नाही, तरी काही फरक पडणार नाही, असेही सत्यराज यांनी आपल्या माफीनाम्यात स्पष्ट केले आहे.

एकीकडे कर्नाटकमध्ये बाहुबली 2 ला जोरदार विरोध सुरू आहे. सिनेमा प्रदर्शित न करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. तर काही स्थानिक पक्षांनी बाहुबली दोन राज्यात प्रदर्शित न करण्याची भूमिका घेतली आहे. तर यापूर्वी राजामौली यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून कर्नाटकच्या लोकांना सिनेमा प्रदर्शित होऊ द्यावा, असे आवाहन केले होते. त्यामुळे आता 28 एप्रिल रोजी कर्नाटकमध्ये बाहुबली 2 प्रदर्शित होणार की नाही हे पाहणे मोठ्या उत्सुकतेचे ठरणार आहे.