भुसावळ । राष्ट्रीय पातळीवरील शाळासिद्धी उपक्रमांतर्गत शाळांनी स्वयंमूल्यमापन केल्यानंतर शाळा ए ग्रेडमध्ये आल्यास अशा शाळांचे महाराष्ट्र विद्या प्राधिकरणातर्फे बाह्य मूल्यमापन करण्यात येवून शाळांना समृद्ध शाळा प्रमाणपत्राने गौरविण्यात येणार असल्याचे शाळासिद्धी उपक्रमाचे राज्य कार्यक्रम अधिकारी आसिफ शेख यांनी सांगितले.
तीन दिवसीय कार्यशाळेत तज्ञांचे मार्गदर्शन
निर्धारक निर्मिती कार्यशाळेच्या दुसर्या टप्पात भेटीप्रसंगी शेख यांनी नाशिक विभागातील जळगाव, नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील निर्धारकांना मार्गदर्शन केले. पहिला टप्पा 7 ते 9 तर दुसरा टप्पा 22 ते 24 मार्च दरम्यान पार पडला. दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यशाळेचा प्रारंभ झाला. दोन्ही टप्प्यातील तीनदिवशीय कार्यशाळेत जिल्ह्यातील तज्ञ मार्गदर्शक तथा सुलभक अनिता परमार व डॉ. जगदीश पाटील तसेच भरत सूर्यवंशी नाशिक, सतीश जाधव नाशिक, अनिल अहिरे धुळे, अर्चना जगताप नंदूरबार, मनोहर चौधरी धुळे, विलास पाटील धुळे यांनी शाळासिद्धीतील विविध घटकांचे विश्लेषण करून प्रशिक्षणार्थी निर्धारकांकडून गटकार्य सादरीकरण करून घेतले. कार्यशाळेत नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातून 35, जळगाव जिल्ह्यातून 43, धुळे जिल्ह्यातून 20 आणि नंदूरबार जिल्ह्यातून 8 असे एकूण 106 प्रशिक्षणार्थी निर्धारक आणि 8 तज्ञ मार्गदर्शक तथा सुलभक सहभागी झाले होते. दरम्यान, शाळासिद्धी उपक्रमाचे राज्य कार्यक्रम अधिकारी आसिफ शेख यांनी कार्यशाळेला भेट दिली. यावेळी शाळासिद्धी पुस्तिकेचे भाषांतर करणार्या सारीका शिंदे उपस्थित होत्या. बाह्य निर्धारक निर्मितीसाठी राज्यभरात आठ ठिकाणी विभागीय निर्धारक निर्मिती कार्यशाळा घेण्यात येत असल्याचेही आसिफ शेख यांनी सांगितले. प्राचार्य डी.डी. सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी अधिव्याख्याता तथा प्रशिक्षण समन्वयक अनिल भांगरे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. नेहा शिरोरे, जेष्ठ अधिव्याख्याता रंजना लोहकरे, विषयतज्ञ गाढे, अहंकारे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप पाटील यांनी केले.