धुळे । बिहारमधील चंपारण सत्याग्रह शताब्दी वर्षाचा समारोप 10 एप्रिल रोजी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथील ‘सत्याग्रह से स्वच्छाग्रह’ कार्यक्रमात सहभागी होऊन देशातील 20 गावांमधील स्वच्छतादूतांशी संवाद साधणार आहेत. यात महाराष्ट्रातील धुळे व जळगाव जिल्हातील दोन गावांचा समावेश आहे.
धुळे व भुसावळचा समावेश
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशात सत्याग्रहाची सुरवात बिहारमधील चंपारण येथून केली होती. या घटनेला 100 वर्षे पूर्ण झालीत. त्यामुळे एका वर्षापूर्वीच चंपारण सत्याग्रह शताब्दी कार्यक्रमाची सुरवात झालेली होती. त्याचा समारोप 10 एप्रिल रोजी होत आहे. यावेळी पंतप्रधान देशातील स्वच्छता क्षेत्रात काम करणार्या स्वच्छतादुतांशी इलेक्ट्रीक माध्यमाद्वारे संवाद साधतील. त्यासाठी देशातील 20 गावांची निवड करण्यात आलेली आहे. त्यात महाराष्ट्रातून फक्त धुळे व भुसावळ या दोन गावांचा समावेश केलेला आहे.
जिल्ह्यातील 250 स्वच्छतादूत राहणार उपस्थित
या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदर्शनची ओबी व्हॅनही दाखल झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात चंपारण येथील कार्यक्रमाचे थेट प्रेक्षेपण केले जाईल. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्हयातील जवळपास 250 स्वच्छतादूत उपस्थित राहणार आहेत. वेळ मिळाल्यास पंतप्रधान या स्वच्छतादुतांशी संवाद साधत त्यांनी स्वच्छतेसाठी केलेले प्रयत्न त्यांच्याकडून जाणून घेतील असेही सांगण्यात आले. दरम्यान महाराष्ट्रातून फक्त धुळे व भुसावळ येथील स्वच्छतादुतांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छतादुतांनी कसे बोलावे याची चाचणी घेण्यात आली. पंतप्रधानांना अवघ्या एका मिनीटात गावात केलेले कार्य स्वच्छतादुतांना सांगायचे आहे.