मुंबई । बीडीडी चाळीत 30 वर्षापासून राहणार्या पोलिसांना म्हाडाची घरे तयार झाल्यावर ती हस्तांतरित करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाला दिले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार पोलिसांना या वसाहतीत एकूण 2950 घरे देण्यात येणार आहेत. ते सोमवारी मंत्रालयात आयोजित बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाबाबत बैठकीत बोलत होते. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बीडीडी चाळीत गेल्या 30 वर्षांपासून जवळपास 2950 पोलीस कुटुंबीय राहतात. म्हाडाची घरे तयार झाल्यावर त्यापैकी 2950 घरे गृह विभागाला हस्तांतरित करावीत.
पोलीस वसाहतीची दुर्दशा
पोलीस वसाहत असलेल्या बीडीडी चाळींची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. कमालीची अस्वच्छता, रखडलेली दुरूस्तीची कामे, सुरक्षा आधी सर्व जबाबदारी चाळीतील रहिवाशांना पार पडावी लागते. चाळीच्या बाजूलाच कचराकुंडी आहे. त्यामुळे तेथे डासांचे प्रमाण वाढलेले असते. चाळींतील घरांच्या छपरांची दुर्दशा झाली आहे. घरांच्या भिंती भुसभुशीत झाल्या आहेत, पोपडे निघाले आहेत. त्यामुळे ते कधीही डोक्यावर पडेल, अशी भिती सतत चाळकर्यांना वाटत असते. याशिवाय, पाणी गळतीचे प्रमाण देखील भरपूर आहे. शिवाय चाळीमध्ये सार्वजनिक शौचालय असल्याने वयोवृद्धांचे हाल होत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या या वसाहतीची अवस्था फार बिकट बनली आहे.
घरे देताना त्याचे निकष काय असावेत, याचा निर्णय गृह विभागाने घ्यावा. 1996 नंतर बीडीडी चाळीत अनधिकृत राहणार्या कुटुंबांना काही दंड आकारुन त्यांनाही नियमित करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. तसेच म्हाडाच्या घरांची कामे तातडीने सुरु करावीत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीला मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी सुभाष लाखे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.