बेळगावात भीषण अपघात; औरंगाबादचे सात जण ठार

0

बेळगाव: पुणे-बंगळुरू महामार्गावर कार आणि ट्रक दरम्यान झालेल्या भीषण अपघातात सात प्रवासी जागीच ठार झाले. बेळगावमधील श्रीनगर येथील महामार्गावर आज रविवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात ठार झालेले सातही प्रवासी औरंगाबादचे रहिवासी आहेत.

आज दुपारी बेळगावच्या श्रीनगर गार्डनजवळील पुणे-बंगळुरू महामार्गावर कोल्हापूरहून गोव्याकडे निघालेल्या कारचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार दुभाजकाला जाऊन धडकून दुसऱ्या बाजुला आदळली. तेवढ्यात कोल्हापूरहून येत असलेल्या एका भरधाव ट्रकने मध्येच आलेल्या या कारला जोरदार धडक दिल्याने कार दूरवर जाऊन आदळली. रस्त्यावरच कार आदळून उलटी पडल्याने कारमधील प्रवाशांच्या डोक्याला आणि मानेला भीषण मार लागला. या अत्यंत भीषण अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या सातही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात नंदू पवार (वय २८), अमोल नेवी(२६), सुरेश कणेरी(२९), अमोल चौरी (२६), महेश पांडळे (२८) महेश चावरे आणि गोपाळ पाटील आदी सातही प्रवासी जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आयुक्त बी .एस. लोकेश कुमार, वाहतूक व गुन्हे विभागाच्या डीसीपी यशोदा वंटगोडी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव वाहतूक उत्तर विभाग पोलीस ठाण्यात सदर अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघात स्थळी कारचा चेंदामेंदा झाल्याने कारमधील मृतदेह काढण्यासाठी बरेच परिश्रम करावे लागले. अपघातात कारच्या ठोकरीमुळे ट्रकची समोरील बाजू चेपली आहे.