हरिविठ्ठल नगर परिसरातील घटना ; कौटुंबिक वादातून आत्महत्येची शक्यता
जळगाव : नमो बुध्दाय…माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, मी स्वत: मृत्यूस कारणीभूत आहे. माझा मृतदेह बेवारस समजून कचरा कुंडीत टाकावा अशा आशयाची मृत्युपूर्व चिठ्ठी लिहून राजेश हिंमत मकवाना (40) या पेंटर काम करणार्या तरुणाने गळफास घेतल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजता घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नसले तरी कौटुंबिक वादातून त्याने आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांच्या तपासात खरे कारण उघड होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश मकवाना हे पत्नी रेखा, मुलगा विकास (19), राहूल (16) व देवेंद्र (14) अशासंह हरविठ्ठल नगरात वास्तव्यास होता. पेंटर काम करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचे. पत्नी रेखा मुलांसह धरणगाव येथे माहेरी गेली होती. त्यामुळे राजेश एकटाच घरी होता. राजेश याचा लहान मुलगा देवेंद्र हा वाघ नगरात राहणारा भाऊ यशवंत यांच्याकडेच राहतो. राजेश यला प्रकाश, मधुकर व यशवंत असे तीन भाऊ आहेत. आई इतर मुलाकडे वास्तव्याला आहे.
मोठ्या मुलामुळे आत्महत्येचा प्रकार उघड
मोठा मुलगा विकास उर्फ विक्की दुपारी घरी आला असता घरात पत्र्याच्या खोलीत वडील राजेश याने साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने तत्काळ ही माहिती इतर काका व आईला कळविली. रामानंद नगर पोलीस स्टेशनचे मनोज इंद्रेकर व गणेश देसले यांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, विवेक बापू मोरे (26, रा.शिवकॉलनी) याच्या माहितीवरुन रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अशी आहे मृत्यूपूर्वी चिठ्ठी
आत्महत्या करण्यापूर्वी राजेश याने चिठ्ठी लिहिली आहे, त्यात म्हटले आहे की, नमो बुध्दाय…माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही मी स्वत: मृत्यूस कारणीभूत आहे. माझा मृतदेह बेवारस समजून कचरा कुंडीत टाकावा हीच नम्र विनंती. सर्वांना सद्बुध्दी प्राप्त होवो ही बुध्दचरणी प्रार्थना…मी एकटा आहे. त्यामुळे बेवारस आहे. तरी कुणास जबाबदार धरु नये. असे चिठ्ठीत नमूद आहे.