बैलगाड्यांच्या शर्यती ही महाराष्ट्राची परंपरागत संस्कृती आहे. ग्रामीण भागात ग्राम दैवतांच्या उत्सवानिमित्त यात्रा पार पडते त्यात मुख्य आकर्षण बैलगाडी शर्यतींचे असते. यामुळे कामानिमित्त विखुरलेला समाज एकत्र येतो, पै पाहुणे घरी येतात, शेतकरी वर्ग लहान मुलांमध्ये एक आनंदाच वातावरण असतं. आपली सर्व दु:ख विसरुन नावालाच फक्त राजा असणारा माझा शेतकरी त्या दिवशी एक दिवस का होईना राजा म्हणून मिरवतो. यात्रेमध्ये गोरगरीब लोकांची दुकाने मोठ्या थाटाने उभी राहतात. त्या निमित्ताने पैशाची देवाणघेवाण होऊन मोठी आर्थिक उलाढाल होते. शेतकरी वर्ग एक दिवस का होईना खुष राहायचा. पण, बैलगाडा शर्यत बंदीच्या जाचक निर्णयाने गरिबांच्या पोटावर पाय पडला. खेळणी, छोटे हॉटेल व्यावसायिक, वाजंत्री, ऊसाचे रसवाले व यात्रे निमित्त व्यवसायावर अवलंबून असणारे इतर व्यवसायिक आज अडचणीत आलेत. या बंदीने परंपरेनुसार चालत आलेली संस्कृती मोडकळीस चाललेय की, काय ही भीती वाटू लागली आहे. कुठे तरी हे थांबायलाच हवं. नाहीतर बैल हा प्राणी पुढच्या पिढीला पुस्तकात शोधावा लागेल.
महाराष्ट्रात खिल्लार अन् कर्नाटकातील म्हैसूर जातीचे बैल चपळ असल्यामुळे शर्यतीमध्ये या बैलांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. बैल बाजार देखील बंदीमुळे थंडावले आहेत. यांत्रिकीकरणामुळे शेतीच्या कामातून बैलांचा वापर फार कमी झाला आहे. एकीकडे सरकार गोवंश वाचावा म्हणून प्रयत्न करतंय तर दुसरीकडे ही अशी बंदी घालून शेतकर्याला अडचणीत टाकतंय.
बैलगाडा शर्यती दरम्यान बैलांचा छळ होतो, क्रूरपणे वागवलं जात, असं स्पष्ट करत केंद्र सरकारने जुलै 2011 मध्ये एक अध्यादेश काढून बैलांच्या शर्यतीवर बंदी घातली. बैलगाडा मालकांच्या संघटना मुंबई उच्च न्यायालयात गेल्या. त्यानंतर त्याठिकाणी बैल, वळू आणि सांड या संज्ञेवर युक्तिवाद करून 12 सप्टेंबर 2012 रोजी बैलगाडी मालकांनी बाजी मारली. त्यानंतर शर्यत पूर्ववत चालू झाली. पुढे 2 महिन्यातच प्राणी मित्र संघटनांनी बैल, वळू आणि सांड हा एकाच प्राणी आहे, असं न्यायालयाला पटून दिलं व 26 नोव्हेंबर 2012 रोजी बैलगाडा शर्यतीवर पुन्हा बंदी आली. मुंबई उच्च न्यायालयात निर्णय विरोधात गेल्यामुळे बैलगाडा संघटनांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले तिथे दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप-प्रत्यारोप होत शेवटी सुप्रीम कोर्टाने 15 फेब्रुवारी 2013 या दिवशी शर्यत बंदीच्या निर्णयाला काही नियम, अटी घालून स्थगिती दिली. त्यानंतर शर्यती पुन्हा धुमधडाक्यात चालू झाल्या. दरम्यान, ज्या नियम व अटी कोर्टाने दिल्या होत्या त्या काही ठिकाणी पाळल्या गेल्या नाही. त्यात काही प्राणी मित्र संघटना खोटे पुरावे गोळा करत पुन्हा कोर्टात गेले अन् 7 मे 2014 रोजी सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यत बंदीचा अंतिम निकाल दिला. बैलगाडी मालकांमध्ये पुन्हा निराशेचे वातावरण झाले एवढा संघर्ष करत कोर्ट विरोधातच निर्णय देत होते. केंद्रात 26 मे 2014 नंतर भाजप सरकार आले. सर्व बैलगाडी मालकांचा अन् संघटनांचा एकच आग्रह होता आता केंद्र सरकारने कायद्यामध्ये बदल करावा अन् या मागणांसाठी बैलगाडी मालकांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे साकडे घातले. तामीळनाडू राज्यातील जलीकट्टू ही स्पर्धा संक्रांतीला असते. त्यापार्श्वभूमीवर तब्बल 2 वर्षांनी केंद्र सरकारने 7 जानेवारी 2016 ला नवीन राजपत्र काढून त्यात नियम व अटी टाकून शर्यतींना परवानगी दिली. परंतु, सर्व प्राणी मित्र संघटना त्या निर्णयाविरोधात एक झाल्या आणि त्यानिर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले. बैलगाडी संघटनांनी देखील सुप्रीम कोर्टात धाव घेतली. परंतु, 12 जानेवारी 2016 च्या सुनावणीमध्ये कोर्टाने पुन्हा त्या निर्णयाला स्थगिती दिली अन् बैलगाडी मालकांच्या पदरी घोर निराशा पडली.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महाराष्ट्राची बैलगाडा शर्यत, तामीळनाडू मधील जलीकट्टू, कर्नाटकमधील कंबालासह पंजाबमधील किला रायपूर बैलगाडी शर्यत बंद आहेत. तामीळनाडूमध्ये संक्रांतीच्या मुहुर्तावर होणार्या जलीकट्टू स्पर्धा हा तमिळीयन जनतेच्या अस्मितेचा प्रश्न असतो. तिथे सर्व राज्यामध्ये या स्पर्धा होतात. परंतु, यंदा देखील त्या होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे तिथे खूप अस्वस्थेचे वातावरण होते. सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे तो निकाल लवकर द्यावा, असा तामीळनाडू सरकारने कोर्टाकडे आग्रह धरला होता. परंतु, आमच्या कामकाजात हस्तक्षेप करू नका, असं सांगत कोर्टाने त्यांना फटकारले. जलीकट्टू स्पर्धा झालीच पाहिजे. दोन दिवसांत आमच्या मागण्या मान्य करा, असा आक्रमक पवित्रा घेत मरिना बीचवर मोठ्या संख्येने तामीळनाडूतील जनतेने भव्य आंदोलन केले. त्याची दखल त्यांच्या राज्य सरकारने घेतली व चार दिवसांत नवीन अध्यादेश काढून केंद्रातील सर्व परवानग्या घेऊन जलीकट्टू स्पर्धा सुरू केली.
प्राणिमित्र संघटना आरोप करतात शेतकरी बैलांना मारहाण करतात. दारू पाजतात. मिर्चीची पूड डोळ्यात टाकतात वगैरे वगैरे. परंतु, या एकाही आरोपात तथ्य नाही किंवा तसा पुरावा देखील नाही. दारू पिऊन माणूस सरळ चालू शकत नाही तर बैलांची काय अवस्था होईल…?
-समीर थोरात