मुरूड जंजिरा । मुरूड तालुक्यातील बोर्ली येथील स्थानकात असणार्या सार्वजनिक गटाराची साफसफाई न केल्यामुळे काल संध्याकाळपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे गटाराच्या पाण्याबरोबर असणारा कचरा हा रस्त्यावर आला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्याकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यालगत असणार्या गटारांची पाहणी करून त्याची खोली वाढविणे, त्यातील कचरा काढून टाकणे,तसेच काही ठिकाणी गटारांची दुरुस्ती करावयाची असेल ती करणे आदी कामे केली जातात. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्याकडून गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा गटारांची पाहणी केली गेली नाही.त्यामुळे त्यांना वेळीच उपाययोजना करता आल्या नाहीत.सात ते आठ वर्षांपूर्वी बोर्ली येथील स्थानकातील गटाराचे करण्यात आले होते. त्यावेळी गटाराचे उंची ही सहाफुट होती. मात्र, आज त्याची उंची ही किमान दोन फुटांपर्यंत राहिली आहे.
या गटारालगत असणारे दुकानदार, रहिवासी हे आपला केर कचरा ह्या गटारात आणून टाकत असतात.त्याच प्रमाणे ह्या गटारावर बोर्ली विश्राम गृहापासून ते स्थानकापर्यंत सहा ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस फुटांचा सिमेंट काँक्रीटचे स्लॅब टाकण्यात आले आहे.त्यामुळे त्या स्लॅबखाली वाहत गेलेला कचरा काढता येत नसल्याने तो तिथे साचून राहिला आहे.त्यामुळे पावसाचे पाणी हे डोंगरातून वाहून येऊन त्या गटारात येत असल्याने गटारातील पाण्याचा प्रवाह हा वाढत जातो. त्यामळे त्याला जाण्यासाठी वाट मिळत नसल्याने तो आपल्या सोबत असणारा गाळ आणि कचरा हा रस्त्यावरून घेऊन जात असतो. पाण्याचा प्रवाह हा कमी झाला की तो कचरा त्याचठिकाणी साचून राहतो आणि त्या कचर्याचा त्रास येणार्या जाणार्या नागरिकांसाहित स्थानिकांनाही होत आहे. चारपाच वर्षांपासून बोर्ली स्थानकात येणार्या मुसळधार पावसामुळे तीन ते चारफूट पाणी साचले होते. मात्र यावर्षी अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच योग्य पावले उचलणे गरजेचे आहे.