भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे चक्रीउपोषण

0

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाचे 126 वे वर्ष असतानादेखील पुणे महापालिकेच्यावतीने 125 वे वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याविरोधात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्यावतीने रविवारपासून 23 तारखेपर्यंत चक्री उपोषणास सुरु केले आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारादेखील त्यांनी दिला.

सरकारने भूमिका जाहीर करावी!
मंडळाचे विश्वस्त सुरज रेणुसे म्हणाले, यंदाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे 126वे वर्ष असूनदेखील हे सरकार आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही. याच्या निषेधार्थ आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला आहे. `गणेशोत्सव सुरु होण्यास अगदी काही दिवस शिल्लक राहिले असून, सरकारने भूमिका जाहीर करावी. अन्यथा आमचा लढा अखेरपर्यंत सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी यापूर्वी मंडळाकडून मंडई येथील चौकात काळ्याफिती बांधून आंदोलन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी महापालिकेच्या भूमिकेचा निषेध करीत मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सत्कार स्वीकारणार नसल्याची भूमिका जाहीर केली होती.

लोगोवरून टिळकांना हटविले होते..
गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त पालिकेतर्फे विशेष बोधचिन्ह (लोगो) तयार करण्यात आले आहे. या लोगोवर सुरूवातीला लोकमान्य टिळकांचे चित्र होते. मात्र, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने टिळकांचे चित्र बोधचिन्हावरून काढून टाकले आहे. बोधचिन्हाचा आकार मर्यादित असल्याने त्यावर लोकमान्य टिळकांचे छायाचित्र वापरले नसल्याचे पालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.