भाजपच्या चेहऱ्यावरील मेकअप उतरला: शिवसेना

0

मुंबई: राज्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे भाजपाच्या चेहऱ्यावरचा मेकअप उतरला असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये भाजपाची पीछेहाट झाली असून त्या ठिकाणी कॉंग्रेसने बाजी मारली आहे. एकंदरीत सत्ता हेच भाजपचे टॉनिक होते. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली आहे, असं म्हणत शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राची सत्ता गमावल्याने जिल्हा परिषदाही रिकाम्या झाल्या. कुठे शिवसेना, कुठे राष्ट्रवादी तर कुठे काँग्रेस आणि वंचित आघाडीची सरशी झाली आहे. जिल्हा परिषदांचा कौल स्पष्ट आहे. सहापैकी पाच जिल्ह्यातून भाजपला नाकारण्यात आले. भाजप आता काय करणार? असं शिवसेनं म्हटलं आहे. एक धुळे वगळता भाजपच्या चेहऱ्यावरील मेकअप’ उतरला. सत्तेमुळे आलेली ही लाली सत्ता जाताच उतरली. ज्याच्या हाती बऱ्यापैकी सत्ता असते त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांत विजय होतो. राज्यात सत्ताबदल झाल्याची तुतारी सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निकालांनी फुंकली आहे.

भाजपचा दारुण पराभव फडणवीस, गडकरींच्या गावातच झाला. शिवसेना काँग्रेसच्या रंगात रंगली असून भगवा रंग विसरली असल्याची गरळ गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच ओकली होती. पण नागपूर हा त्यांचा बालेकिल्ला असतानाही फडणवीस-गडकरी तेथील भाजपचा पराभव का थांबवू शकले नाहीत? याचे कारण एकच, ग्रामीण भागातील जनता तुमच्या रोजच्या बकवास बाजीला कंटाळली असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.