भाजपमध्ये त्रास होत असेल तर शत्रुघ्न सिन्हानीं पक्षातून बाहेर पडावे – सुशील मोदी

0

पाटणा : भाजपमध्ये इतकाच त्रास होत असेल तर शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षातून बाहेर पडावे, असे विधान बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केले आहे. शत्रुघ्न सिन्हा ज्याप्रकारे बोलतात, जी भाषा वापरतात, ते पाहता त्यांनी पक्षातून बाहेर पडायला हवे. इतका त्रास होत असेल तर ते पक्षात का थांबले आहेत? ते दरवेळी पक्षाला दुषणे देतात आणि नंतर आपण अजूनही भाजपमध्ये असल्याचे सांगतात. यशवंत सिन्हा यांच्या संगतीचा त्यांच्यावर वाईट परिणाम झाला आहे, असे सुशील मोदी यांनी म्हटले आहे. ते एका स्थानिक वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर कायम टीका करणारे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात भाजपमधील नेते आक्रमक झाले आहेत.

सुशील मोदी यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे भाजपमधील नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. शत्रुघ्न सिन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायलयाही ते कचरत नाहीत. नरेंद्र मोदी यांनीही कधीही चहा विकला नाही. तो केवळ प्रोपोगंडाचा एक भाग होता. परंतु, एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर मला साधे मंत्रीपद मिळू शकत नाही का, असा सवाल त्यांनी नुकताच एका कार्यक्रमात केला होता.