जळगाव । जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीबरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची आचार संहिता लागु आहे. नुकतीच विधान परिषदेची आचार संहिता संपुष्टात आली आहे. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीची आचार संहिता कायम आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाने आचार संहितेचे उल्लंघन केले आहे. आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्षाचे फलक लावण्यास कायदेशीर बंदी असतांना भाजपाने निवडणुक काळात सार्वजनिक ठिकाणी पक्षाचे फलक लावत आचारसंहिता भंग केली आहे.
खोटे नगर बसथांब्याजवळ भाजपाचा विजयीचा फलक
शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील खोटे नगर बस थांब्याजवळ भाजपाकडुन मुद्रा योजनेसंबंधी फलक लावण्यात आले आहे. परंतु या फलकावर भाजपा निवडणुक चिन्ह असुन विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा प्रकार आचारसंहिता भंग करणारा आहे. निवडणुक आचार संहिता लागु झाल्यानंतर राजकीय पक्षाला प्रचार अथवा प्रसार होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी असलेले फलक, होर्डीग्जवरील बॅनर्स, पत्रके काढले जाते आचारसंहितेचा भंग झाल्यास संबंधीत पक्षावर निवडणुक आयोग कायदेशीर कारवाई करते. ही सार्वजनिक ठिकाण असून प्रशासनाला देखील याचा विसर पडला आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
याविषयी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी पांण्डेय यांच्याशी संपर्क साधला असता. हा विषय माझ्याशी संबंधीत नसुन जिल्हाधिकारी यांच्याशी संबंधीत असल्याचे उत्तर त्यांनी दिले. तर जिल्हाधिकारी निवडणुक प्रशिक्षण घेण्यासाठी नाशिक येथे असल्याची माहिती त्यांनी दिली.