पुणे: विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात मेगाभरती करण्यात आली होती. भाजपामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून अनेक नेत्यांनी प्रवेश केला होता. भाजपाची ही मेगाभरती चूकच होती अशी कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ‘भाजपमध्ये काही मागावं लागत नाही. पक्षासाठी काम करणाऱ्यांना आपोआप मिळतं. ही भाजपची संस्कृती आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी झालेल्या मेगाभरतीमुळं ही संस्कृती कुठंतरी ढासळली. चंद्रकांत पाटील यांचा रोख नेमका कुणावर होता, याबाबत आता भाजपच्या वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपनं अन्य पक्षांतील आमदार व खासदार फोडण्याचा धडाकाच लावला होता. आमच्याकडं वॉशिंग मशीन आहे, असं म्हणण्यापर्यंत भाजपच्या नेत्यांची मजल गेली होती. मात्र, निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानं आणि सत्ता हातची गेल्यानंतर आता भाजपचे नेते चिंतन करू लागले आहेत. त्यातून पक्षातील मेगाभरतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रांजळपणे या चुकीची कबुली दिली आहे.
‘जो आपल्या जवळ आहे त्याला नव्हे तर पक्षाच्या जवळ आहे. त्याला पदं मिळाली पाहिजेत. मात्र, आपल्या पक्षात आपल्या जवळच्यांना पदं देण्याची पद्धत सुरू झाली आहे. हा माझा, तो माझा, तुझे काम करून देतो. तिकडे जातो का? मग त्याच्याकडूनच तिकीट घे. तुला कसं तिकीट मिळत नाही पाहतोच. ही जी संस्कृती रुजलीय तिला सुरुंग लावण्याची गरज आहे,’ असं पाटील म्हणाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाटील यांनी टोला हाणला. ‘ताकद वाढवण्यासाठी इतर पक्षाचे नेते आपल्या पक्षात घ्यावे लागतात, असा फडणवीस यांचा दावा होता. मात्र, तो फोल ठरल्याचं निकालानंतर समोर आलं,’ असं ते म्हणाले.