भाजपाचे मंत्री म्हणतात, एनआरसी कायदा लगेच लागू होणार नाही

0

नवी दिल्ली: राज्यसभा, लोकसभेत एनआरसी कायदा पास करण्यात आल्यानंतर देशभरात या कायद्याला विरोध करण्यात येत आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा बनवण्याचा आमचा मनोदय आम्ही स्पष्ट केला असून त्या कायद्याची अंमलबजावणी केव्हा पासून करायची याबाबत अजून निर्णय झाला नसल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटले आहे. अखिल भारतीय एनआरसीचे नियम तयार होणे बाकी असून तसेच ते विधी विभागानेही त्यावर काहीही प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे हा कायदा लगेचच लागू केला जाणार नाही, त्यासाठी काही कालावधी नक्कीच लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा (एनआरसी) अधिसूचित करणे बाकी असून कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे नियम आणि सूचना तयार करण्याचे काम सुरू असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रीय नोंदणी कायद्याची अंमलबजावणी लांबवणीवर पडल्याचे दिसत आहे.

हा कायदा देशातील सर्वच राज्यामध्ये लागू करण्यात येत असून त्या द्वारे मुस्लिमांना हद्दपार केले जाणार आहे, अशी अफवा काही लोक पसरवत आहेत. म्हणूनच हा कायदा अजूनही लागू करण्यात आलेला नसून. त्याचे नियम तयार करण्याचे काम सुरू आहे आणि भारतातील कोणत्याही नागरिकावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, हे सांगणारी जाहिरात आम्ही मुद्दामहून वर्तमानपत्रांमध्ये दिली आहे, असेही रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.