भाजपाध्यक्ष अमित शहांकडून साध्वी प्रज्ञासिंहांची पाठराखण

0

कोलकाता:मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने मध्य प्रदेशातील भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. उमेदवारी दिल्यानंतर एका सभेत बोलतांना साध्वी प्रज्ञा यांनी २६/११ च्या हल्ल्यात शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे संपूर्ण देशातून साध्वी प्रज्ञा आणि भाजपवर टीका होत आहे. दरम्यान भाजपने साध्वी प्रज्ञासिंह यांची बाजू घेतली आहे. साध्वी प्रज्ञा यांच्याविरोधात हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याद्वारे जगात देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्यात आले. कोर्टात त्यांचा खटला खोटा असल्याचे सिद्ध झाले, अशा शब्दांत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची पाठराखण केली आहे. आज कोलकाता येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


स्वामी असीमानंद आणि इतर लोकांना खोटे खटले दाखल करुन आरोपी बनवण्यात आले. समझौता एक्स्प्रेसमध्ये स्फोट करणारे लोक कुठे आहेत. ज्या लोकांना पकडण्यात आले होते त्यांना का सोडण्यात आले, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

दोन टप्प्यातील निवडणुकांनंतरच ममता दीदींना त्यांचा पराभव स्पष्टपणे दिसतो आहे, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये यंदा परिवर्तन होणारच, अशा शब्दांत शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. आमच्या नेत्यांच्या सभांना परवानगी न देणाऱ्या ममता दीदींनाच आता इथल्या जनतेनेच नाकारलं आहे. त्यांच्या सभांना गर्दी होत नाही, त्यामुळे आता त्या मतदारांच्या मनात भिती निर्माण करण्याचा हरऐक प्रयत्न करीत आहेत.