मुंबई: भाजपाने राज्यावर पाच वर्षात पाच पाच लाख कोटींचे कर्ज लादले असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांनी जे संकल्प योजले आहेत त्यावर वेगाने, पण सावधपणे पावले टाकावी लागतील. पंतप्रधान मोदी यांनी नव्या सरकारला व मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने गतिमान विकास घडवावा, असे आमच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुःखाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी केंद्रालाच सहकार्याचा हात पुढे करावा लागेल,’ अशी अपेक्षा शिवसेनेने व्यक्त केली आहे.
नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे यांच्यातील नाते भावा-भावाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधान म्हणून साथ देण्याची जबाबदारी मोदी यांची आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात, एका पक्षाचे नसतात हे सूत्र ठेवले तर जे आपल्या विचारांचे नाहीत त्यांच्या सरकारविषयी मनात राग-लोभ का ठेवायचा? असेही शिवसेनेने म्हटले आहे.
हे राज्य जनतेचे आहे व ते १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी जनता दिल्लीशी झुंजली. संघर्ष आणि लढे आमच्या पाचवीलाच पुजले आहेत. दिल्ली देशाची राजधानी जरूर आहे, पण महाराष्ट्रही दिल्लीश्वराचा गुलाम नसल्याचा निर्वाळा पुन्हा एकदा शिवसेनेने केला आहे.