नवी दिल्ली : शिवसेना, भाजपा यांची ३० वर्ष असलेली युती तुटल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली होती. युती तुटल्याची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेच्या खासदारांची आसनव्यवस्था बदलवून त्यांना विरोधी पक्षात केली आहे. दरम्यान, भाजपाने शिवसेनेशी युती तोडून देशाच्या राजकारणातील आपला सर्वात मोठा मित्रपक्ष गमावला आहे. भविष्यात भाजपाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा भाजपावर तोफ डागली. महाराष्ट्राचा विचार केल्यास भाजपाला शिवसेनेने उभे केले, जागा दिली. शिवसेना ही रालोआ मधील जुन्या सदस्यांपैकी एक होती. मात्र आता भाजपाने शिवसेनेच्या संसदेतील खासदारांची आसनव्यवस्था बदलली आहे. भाजपाने युती तोडून आपला जुना आणि सर्वात मोठा मित्र पक्ष गमावला आहे. याची किंमत भाजपाला भविष्यात मोजावी लागेल. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासोबत युती करण्याची शिवसेनेची इच्छा नव्हती. मात्र अमित शाह मातोश्रीवर आले आणि युतीबाबत बोलणी केली असल्याचे राऊत म्हणाले.
”शिवसेना मोठा पक्ष आहे, म्हणून सरकार स्थापनेविषयी शिवसेनेला जाऊन विचारा, हे म्हणणे चुकीचं नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही गंभीर असून राज्यातील सर्वच खासदारांनी याप्रश्नी एकत्र यावे. मोदींनी पवारांचं कौतुक केलं म्हणून काय झालं. पवार माझे गुरु असल्याचं मोदींना जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे, त्याचा राजकीय अन्वयार्थ निघत नाही. शिवसेनेच्या मनात कुठलाही गोंधळ नसून मीडियाच्याच मनात गोंधळ आहे, असे राऊत यांनी सांगितले.