भाजपा-सेनेमुळेच एसटी कर्मचार्‍यांवर वाईट दिवस 

कामगार संघटनेचे राजेश सोनवणे यांचा आरोप 

 

कामगार संघटनेचे राजेश सोनवणे यांचा आरोप

जळगाव : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांचा दि. २७ ऑक्टोबरपासून राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी बेमुदत संप आजातागायत सुरु आहे. भाजपा व शिवसेना यांच्यातील सत्ता संघर्षामुळे महामंडळाच्या कर्मचार्‍यांवर वाईट दिवस आले आहेत असा आरोप भारतीय एसटी कामगार संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेश सोनवणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. दरम्यान न्यायालयाच्या आदेशाची प्रतिक्षा करीत कर्मचार्‍यांनी कामावर रूजू व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

भारतीय एसटी कामगार संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेश सोनवणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. ते म्हणाले की, एस.टी. कर्मचार्‍यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. शिवाय शासनाने राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीसमोर लेखी निवेदन सादर करण्यासाठी शासनाने भारतीय एस.टी. कामगार संघटनेला बाजू मांडण्यासाठी निमंत्रीत केले होते. त्यानुसार दि. ३ डिसेंबर २०२१ रोजी संघटनेने आपली बाजु शासनाकडे लेखी स्वरुपात मांडली आहे. भाजपा नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी दिलेल्या पाठींब्यामुळे संपावर तोडगा निघाला नसल्याचाही आरोप त्यांनी केला. यावेळी पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष चेतन नन्नवरे, जहाँगीर खान, संजय अंभोरे, मोहन बिर्‍हाडे, कपिल जाधव, शेनफडू सोनवणे, भगवान गायकवाड, विमल मोरे उपस्थित होते.