पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भाजपचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जातो आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेसमधून गेलेले आमदार पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चेला भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेटाळले आहे. भाजप आमदार संपर्कात असल्याचे सांगणे म्हणजे मनात मांडे खाण्याचा प्रकार आहे. भाजपचा कुणीही आमदार पवारांच्या संपर्कात नाही, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यांनी आज सोमवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार आणि महाविकास आघाडी मुद्दामहून या पुड्या सोडत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ही चर्चा सुरु झाली आहे. मात्र मतदार संघातील कामांसाठी सत्ताधाऱ्यांना भेटण्यात काय गैर आहे?, याचा अर्थ पक्ष सोडणार असे होत नाही असा सवालही त्यांनी केला.
भाजपचे १०५ आमदार आहेत. त्यातले ८० आमदार फुटले तरच त्यांचे पद वाचेल. त्यामुळे भाजप आमदार फुटणे अशक्य आहे असा ठाम विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार विरोधी पक्षावर खुन्नस काढत असल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला. हे सरकार इतकी खुन्नस काढत आहे की, आमच्या आमदारांच्या मतदारसंघात विकासाची कामेदेखील होत नाहीत. त्यामुळे नाइलाजाने या आमदारांना पवारांकडे जावे लागत आहे.