अहमदाबाद : काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या वाहनांच्या ताफ्यावर गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात दगडफेक झाली होती. या प्रकरणी भाजपचा स्थानिक नेता व बनासकांठाचा भाजपचा जिल्हा महामंत्री जयेश दर्जी यास पोलिसांनी शनिवारी धनेरा येथून अटक केली. त्याच्यासह अन्य तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दर्जी हा या घटनेतील मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या ताफ्यावरील हल्ल्याचे महाराष्ट्रासह अन्य राज्यातही पडसाद उमटले. हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
देशभरात निषेधासाठी आंदोलन
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी पूरग्रस्त गुजरातच्या दौर्यावर गेले असताना काही लोकांनी काळे झेंडे दाखवले; तसेच त्यांच्या वाहनताफ्यावर दगडफेकही केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कारवर दगडफेक करून मोदी-मोदी अशा घोषणा दिल्याचा दावा काँग्रेसने केला होता. भाजपच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला होता. या घटनेनंतर शनिवारी महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला. सालापूर येथे प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले.
हल्ल्यामागे भाजप, आरएसएस
हल्ल्याच्या मागे भाजप आणि आरएसएसचा हात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनीही शनिवारी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला होता. ज्यांनी हल्ले घडवून आणले तेच या हल्ल्याचा निषेध कसा करतील. मोदी आणि आरएसएस-भाजपची राजकारणाची हीच पद्धत आहे. नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणाबाजी, आम्हाला काळे झेंडे दाखवणे, दगडफेक करणे आदी प्रकार केल्याने आम्ही मागे हटणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीने पूरग्रस्तांना मदत करू, असे राहुल गांधी यांनी म्हटले.