भामा आसखेड धरणातून दुसरे आवर्तन

0

चाकण : खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून भामा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून या पाण्याचा फायदा शेतकर्‍यांना शेतीसाठी व गावच्या पाणीपुरवठा योजनांना होणार आहे. सध्या धरणात 47.8 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. रब्बीच्या हंगामातील पिकासाठी पाणी सोडण्याची मागणी खेड, शिरूर, दौड या तालुक्यातील शेतकर्‍यांनी करंजविहिरे येथील भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन उपविभाग कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली होती. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार येथील धरणाच्या आयसीपीओद्वारे पाणी भामा नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

या पिंकांना जीवदान
शेतकर्‍यांच्या मागणीनुसार यापूर्वी धरणातून एक आवर्तन रब्बी हंगामासाठी सोडले होते त्यानंतर हे दुसरे आवर्तन आहे. सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पिकांना जीवदान मिळणार असून शेती फुलणार आहे. उन्हाळ्यात देखील पिकांना धरणातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. सध्या रब्बीच्या हंगामात शेतकर्‍यांनी आपल्या शेतात फ्लॉवर, कोबी, काकडी, पावटा, वांगी, पालक, कोथंबीर, मेथी, भोपळा, भेंडी, गाजर, टोमॅटो, मुळा आदी तरकारी भाजीपाल्यासह गहू, हरबरा, ज्वारी, मका आदी पिकं घेतले असून उन्हाळी बाजरी, भुईमूग पीक घेण्यासाठी लगबग सुरू केली आहे. धरणाचे पाणी उपलब्ध असल्यामुळे अनेक नदी काठच्या शेतकर्‍यांनी फुलांचे मळे देखील बहरले आहे.

सिंचन योजनांचा असाही फायदा
धरणातील पाण्याचा फायदा खेड, शिरूर व दौड तालुक्यातील शेतकर्‍यांना होत आहे. नदीवर असणारे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत यामुळे तुडुंब भरून वाहत आहे. यामुळे भामा नदीदेखील काठोकाठ भरून वाहत आहे. या सोडण्यात येणार्‍या पाण्याचा फायदा विविध गावच्या पाणी योजना आणि उन्हाळी पिकांना होणार आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे पूर्व भागातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना दुसरीकडे मात्र नदी पात्रात खळखळणारे पाणी पाहून मन प्रसन्न होत आहे. सोमवार (दि.20) रोजी धरणातील पाण्याची पातळी 667.70 मीटर असून एकूण पाणीसाठा 117.302 दलघमी आहे. तर धरणात उपयुक्त पाणीसाठा 103.78 दलघमी असून धरणात एकूण पाणीसाठा 47.8 टक्के इतका आहे.