धर्मशाळा । भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्याच एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. भारताने 50 षटकांमध्ये केलेल्या 112 धावांचा टप्पा श्रीलंकेच्या संघाने अवघ्या 20.4 षटकांमध्ये गाठला आहे. अवघ्या तीन विकेट्सच्या मोबदल्यात ते आव्हान पार केले. त्यात सलामीच्या उपुल थरंगाचा 49 धावांचा वाटा मोलाचा ठरला. या विजयासोबतच तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेमध्ये श्रीलंकेने 1-0ने आघाडी घेतली आहे.
मॅचच्या सुरुवातीला श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताचा 112 धावांत खुर्दा उडवला. या सामन्यात भारताचे पहिले सात फलंदाज 29 धावांत माघारी परतले होते. त्या परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीने एकहाती खिंड लढवून भारतीय संघावर नीचांकाची लाजिरवाणी वेळ येऊ दिली नाही.धोनीने 10 चौकार आणि दोन षटकारांसह 65 धावांची खेळी उभारली. धोनीने कुलदीप यादवच्या साथीने आठव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर तळाच्या जसप्रीत बुमराह आणि यजुवेंद्र चहलच्या साथीनेही त्याने आणखी 42 धावांची भर घातली. श्रीलंकेच्या सुरंगा लकमलने 13 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून भारताचा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. नुवान प्रदीपने दोन विकेट्स काढून त्याला छान साथ दिली.