तस्लिमा नसरीन यांचे मत
नवी दिल्ली : पाकिस्तान, बांगलादेशच्या तुलनेत भारतातील अल्पसंख्याकाची स्थिती खूपच चांगली आहे, असे मत वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केले. मातृभूमी बांगलादेशातून निर्वासित झालेल्या तस्लिमा यांना भारत हे त्यांना आपल्या घरासारखेच वाटते. इंदूर येथे एका कार्यक्रमासाठी आल्या असताना नसरीन यांनी हे मत मांडले.
सर्वच संकटे संपली नाहीत
तस्लिमा म्हणाल्या, बांगलादेशात हिंदू आणि बौद्धांवर खूप अत्याचार होतात. मी पाकिस्तानला कधी गेलेले नाही. पण तिथे धार्मिक अल्पसंख्याकाचे बळजबरीने धर्मांतरण आणि त्यांच्यावर अन्याय केले जात असल्याचे वाचले आहे. या दोन्ही देशांच्या तुलनेत भारतात अल्पसंख्याकाची स्थिती खूपच चांगली आहे. भारताचे संविधान सर्वांसाठी सारखेच आहे. भारतातील अल्पसंख्याकासमोरील सर्वच संकटे संपली हे मी म्हणणार नाही, हे त्यांनी आवर्जुन सांगितले.
घरी आल्यासारखे वाटते
तस्लिमा यांनी भारतीय कायदा-सुव्यवस्थेचेही कौतुक करत नसरीन म्हणाल्या, मी युरोपची नागरिक आहे. पण भारतात मला घरी आल्यासारखे वाटते. मी भारत सरकारची आभारी आहे, कारण त्यांनी मला भारतात राहण्याची परवानगी दिली. मला भारतीय समाजासाठी काम करायची इच्छा आहे.