नवी दिल्ली – इस्लामोफोबियाच्या आरोपावरून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार्या पाकिस्तानला इस्लामिक देशांची संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनमध्ये (ओआयसी) तोंडघशी पडण्याची वेळ आली. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसह संघटनेच्या सदस्य देशांपैकी अनेकांनी भारताची बाजू उचलून धरली.
भारत इस्लामोफोबियाला खतपाणी घालत असल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अकरम यांनी आयओसीच्या एका ऑनलाइन बैठकीदरम्यान केला होता. परंतु मालदीवने याचे खंडन करत भारत हा जगातिल सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे, असे म्हटले होते. तसेच भारतात २० कोटीहून अधिक मुस्लिम वास्तव्य करत असून भारतावर असा आरोप करणे अयोग्य आहे. अशा प्रकारचा आरोप दक्षिण आशियाई क्षेत्रात करणे हे धार्मिक एकतेसाठी घातक असल्याचेही त्यांनी म्हटले होते. आता आयओसीमधील अनेक सदस्य देशांनी भारताचे समर्थन केले आहे. भारताचा मित्रदेश ओमाननंदेखील हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे भारताविरोधात पाकिस्ताननं केलेल्या आरोपांवर अन्य देशांनी आपल्या प्रतिक्रियाचे दिल्या नसल्याचेही समोर आले आहे.