भारतीय फलंदाज शिखर धवन प्रकरणात विमान कंपनीचा माफीनामा

0

नवी दिल्ली । भारतीय फलंदाज शिखर धवन हा दक्षिण अफ्रिका दौर्‍यासाठी रवाना झाला. यावेळी त्याच्यासोबत बायको आणि मुलंही होती. मात्र, दुबई विमानतळावर शिखर धवनला त्यांच्यासोबत प्रवास करण्यात मज्जाव करण्यात आला. यानंतर शिखऱ धवनने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता संबधीत विमान कंपनीनेही याप्रकरणी माफी मागितली आहे. शिखर धवनच्या परिवाराकडे जन्म प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्र उपलब्ध नसल्याने त्यांना दुबई विमानतळावर रोखण्यात आले. त्यामुळे शिखर धवनला आपल्या परिवाराला सोडून दक्षिण अफ्रिकेला जावे लागले होते. या घटनेनंतर शिखर धवनने आपल्या ट्विटरवर लिहिले की, मी माझ्या पत्नी आणि मुलांना घेऊन केपटाऊनला जात होतो. मात्र, जन्म प्रमाणपत्र आणि इतर काही कागदपत्र नसल्याने त्यांना दुबईतच थांबावं लागलं. एमिरेट्स एअरलाईन्सकडून खूपच अनप्रोफेशनल व्यवहार मिळाला. शिखर धवने पुढच्या ट्विटमध्ये म्हटलं की, आम्ही आता दुबई विमानतळावर आहोत आणि कागदपत्रांची वाट पाहत आहोत. मुंबई विमानतळावरून फ्लाइटमध्ये बसलो त्यावेळी एमिरेट्सने आम्हाला यासंदर्भात का विचारले नाही?

धवनने केलेला आरोप फेटाळला
या सर्व प्रकरणानंतर आता एमिरेट्स एअरलाईन्सने माफी मागितली आहे. कंपनीने शिखर धवनला मिळालेल्या असुविधेसाठी माफी मागितली मात्र, त्यासोबतच धवनने केलेला आरोप फेटाळला आहे ज्यामध्ये धवनने एअरलाईन्सचा व्यवहार हा अनप्रोफेशनल असल्याचं म्हटलं होत, तर, कंपनीने आपलं स्पष्टीकरण देताना म्हटलं की, आम्ही केवळ दक्षिण आफ्रिकेमध्ये असलेल्या कायद्यांचं पालन करत होतो. एमिरेट्सच्या प्रवक्त्याने म्हटलं की, आम्हाला माहिती आहे की शिखर धवनच्या परिवाराला ठरलेल्या कार्यक्रमानुसार प्रवास करता आलं नाही. या असुविधेबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. एक जून 2015 पासून दक्षिण आफ्रिकेच्या नियमांनुसार कुठलाही 18 वर्षांपेक्षा लहान व्यक्ती दक्षिण आफ्रिकेला जात असेल तर त्याला आपल्या आई-वडिलांचे संबंधित कागदपत्र दाखवणं आवश्यक आहे. सर्वच एअरलाईन्सला प्रत्येक देशातील नियमांचं पालन करावं लागतं आणि प्रवाशांची जबाबदारी आहे की, त्यांनी प्रवासापूर्वी संबंधित कागदपत्र आपल्यासोबत ठेवावी.

शिखर धवन पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर
भारत आणि द. आफ्रिकेदरम्यान 5 जानेवारीपासून कसोटी सामना सुरू होत आहे. यामध्ये मुरली विजयसोबत के.एल.राहुल डावाची सुरुवात करणार आहेत. गुडघ्याच्या जखमेमुळे सलामीचा फलंदाज शिखर धवन पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. 26 डिसेंबरला कर्णधार विराट कोहलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातून परत येताना धवनच्या गुडघ्याला दुखापत झाली. संघ व्यवस्थापनाला या मालिकेत कुठलाही धोका पत्करायचा नाही म्हणून केएल राहूला संधी देण्यात आली आहे. आपल्या जखमेकडे दुर्लक्ष केल्याने विराट धवनवर चांगलाच नाराज झाला आहे. संघ व्यवस्थापनाला मुरली विजयकडून या सामन्यात जास्त अपेक्षा आहेत. कारण 2011 मध्ये द.आफ्रिकेविरुद्ध 87 धावांनी जिंकलेल्या संघात तो होता.