नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात निदर्शने करताना चिथावणीखोर भाषण करणारा ‘जेएनयू’चा विद्यार्थी शर्जील इमाम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या तो दिल्ली पोलिसांच्या कोठडीत आहे. अटकेनंतर दिल्ली पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. त्यात त्याने अनेक गोष्टींची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याचे विचार आणि धक्कादायक मनसुबे समोर आले आहे. ‘शर्जीलची भारत इस्लामी राष्ट्र व्हावे अशी इच्छा असल्याचे त्याच्या चौकशीतून समोर आले असल्याचे वृत्त माध्यमातून समोर आले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, २५ जानेवारी अलीगड मुस्लिम विद्यापीठात शर्जीलने वादग्रस्त भाषण केले होते. आसामला भारतापासून तोडण्याचा इशारा त्याने दिला होता. या वक्तव्याप्रकरणी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच फरार झालेल्या शर्जीलला बिहारच्या जेहानाबाद येथून अटक करण्यात आली होती.