नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये अनेकवेळा वर्चस्वाची लढाई पाहायला मिळते. भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये तर विस्तवही जात नाही असे बोलले जाते. पाकिस्तान आणि चीन एकत्र येऊन भारताला अडचणीत आणण्याच प्रयत्न करताना पाहायला मिळतात. मात्र तिन्ही देशांवर हल्ला झाला तर एकत्र येऊन शत्रूला नामोहरण करण्याचे ताजे उदाहरण समोर आले आहे. एडनच्या समुद्रात सोमालिया चाचांनी मालवाहतूक करणार्या जहाजावर हल्ला केला होता. त्यानंतर भारत, चीन आणि पाकिस्तानच्या नौदलांनी संयुक्त कारवाई करत सोमालीया चाचांचा बंदोबस्त केला व भारतीय जहाजाची सुखरुप सुटका केला. तिन्ही देशाच्या नौदलांनी चाचांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले होते.
तीनही देशांची संयुक्त कारवाई
शनिवारी रात्री ही घटना घडली. मलेशियातील केलांगमधून निघालेल्या ओएस 35 या मालवाहू जहाजावर सोमालियन चाचांनी हल्ला केला. काही तरी गडबड झाल्याचा धोक्याचा संदेश मिळाल्यानंतर भारतीय नाविक दलाने शनिवारी रात्रीच हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रात्रीच्या अंधारात मालवाहू जहाजाच्या आसपासची परिस्थिती जाणून घेतली. भारतीय नौदलाची आयएनएस मुंबई आणि आयएनएस तरकश जहाजे ज्या भागात हल्ला झाला, त्या ठिकाणी पोहोचली. भारतीय नौदलाची जहाजे हल्ला झालेल्या ठिकाणी पोहोचताच चीन आणि पाकिस्तानच्या नौदलाची जहाजेदेखील संबंधित ठिकाणी आली. चीनने ओएस-35 या 178 मीटर जहाजाच्या मदतीसाठी 18 जणांचे पथक पाठवले. तर भारतीय नौदलाने या जहाजासाठी कम्युनिकेशन लिंक उपलब्ध करुन दिली. यासोबतच या संपूर्ण मोहिमेला हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हवाई मदत देण्याची कामगिरीदेखील भारतीय नौदलाने पार पाडली. त्याचबरोबर चीनच्या नौदलाच्या युलीन जहाजावरुन क्षेपणास्त्र डागण्यात आली. त्यामुळे मालवाहू जहाजाची सुखरुप सुटका होण्यास मदत झाली. पहाटे जहाजाची पाहणी केली असता, त्यात सोमालियन चाचे रातोरात पळून गेल्याचं आढळून आले.
भारतासह पाकिस्तान आणि चीनच्या नौदलांच्या मदतीमुळे मालवाहू जहाजाची सुखरुप सुटका करण्यात यश आले.
– डी. के. शर्मा, प्रवक्ते, भारतीय नौदल